
कॉकरोच जनता पार्टीचे नवी दिल्लीत आंदोलन यशस्वी झाले आहे, धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. अशातच आज कॉकरोच जनता पार्टीची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला पार्टीचे प्रवक्ते सौरभ दास, वकील आणि प्रवक्त्या रत्ना सिंह यांच्यासह ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत बोलताना रत्ना सिंह यांनी मोठं विधान केले आहे. रत्ना यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
आमच्या आदोलकांवर गुन्हे दाखल – रत्ना सिंह
रत्ना सिंह यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांवर कुठे-कुठे गुन्हे दाखल झाले याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, 31 जुलैपासून आम्ही सर्व वकिलांच्या संपर्कात आहोत. ज्यांना ताब्यात घेतलं गेलं त्यांना बाहेर काढण्याचं काम करत आहोत. आसाममध्ये 7-8 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. वकिल मदत करत आहे. एका वकिलाही अटक करण्यात आली आहे. कोलकात्यात 11 जणांना अटक केली आहे. त्यात 10 मुस्लिम आहेत. यावरून एका कम्युनिटीला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पुढे बोलताना रत्ना सिंह यांनी सांगितले की, ‘बिहारमधून सर्वाधिक माहिती येत आहे. बिहारमध्ये लिगल टीमची गरज आहे. एका व्यक्तीसाठी तीन वकील येत आहेत. त्यांच्यात समन्वय घडवायचा आहे. सीवान, पटना आणि छपरा या ठिकाणी विद्यार्थ्यांवर एफआयआर दाखल केले जात आहे. आमचं वकिलांना आवाहन आहे की तुम्हाला जशी मदत करायची आहे ती करावी.
सरकारने गुन्हे दाखल न करण्याचा शब्द दिला – रांका
आंदोलकांवर गुन्हा दाखल न करण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले आहे. यावर बोलताना पार्टीचे प्रवक्ते आशुतोश रांका यांनी सांगितले की, ‘ मंत्री नड्डा यांनी भविष्यात कोणतीही तक्रार करणार नाही आणि कुणावरही गुन्हे दाखल केले जाणार नाहीत असं सांगितलं होतं. मंगळवारपर्यंत अॅग्रीमेंट देणार आहेत. लिखित अॅग्रीमेंट देणार आहेत, आम्ही सरकारची वाट पाहत आहोत. नड्डा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं आणि ट्विटही केलं होतं. सीनियर मंत्र्याने करार केला आहे. त्यामुळे आंदोलकांवर गुन्हे दाखल केले जाणार नाही. गुन्हे मागे घेतील ही आशा आहे. उद्यापर्यंत लिखित अॅग्रीमेंट दिलं नाही तर आम्ही पुन्हा आंदोलन करू.’
Leave a Reply