
Vaibhav Suryavanshi Statement: राजस्थान रॉयल्सचा तडाखेबाज खेळाडू वैभव सूर्यवंशी याने गोलंदाजाचा घामाटा काढला आहे. त्याने आयपीएल 2026 च्या 64 व्या सामन्यात कमाल दाखवली. त्याच्या फलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने लखनऊ सुपर जायंट्स (LSG) विरोधात 221 धावांचे लक्ष्य सहज गाठले. त्याने 38 चेंडूवर 93 धावा चोपल्या. त्याच्या तुफान खेळीने प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. वैभवने 10 गगनचुंबी षटकार आणि 7 चौकार ठोकले. पण शतकी खेळी त्याला खेळता आली नाही. पण बाद होण्यापूर्वीच त्याने राजस्थान रॉयल्सचा विजय पक्का केला.
वैभव सूर्यवंशी म्हणाला काय?
वैभवने आयपीएलमध्ये तिसरे’प्लेअर ऑफ द मॅच’ पारितोषक मिळवले. त्यावेळी त्याने त्याच्या खेळीविषयी माहिती दिली. धावांचा मोठा डोंगर उभा होता. त्यामुळे कोणतीही घाई न करता खेळायचं हे अगोदरच निश्चित केले होते. थोडा वेळ घेऊन खेळण्याचे ठरवले होते. जास्त वेळ धावपट्टीवर थांबल्यास दुसऱ्या फलंदाजालाही त्याचा फायदा होईल, असा विचार मैदानात येण्यापूर्वी केल्याचे वैभवने सांगितले. वैभव कालच्या सामन्यात शतकी खेळी करू शकला नाही याची खंत त्याच्या चाहत्यांना आहे.
आल्या आल्याच का नाही ठोकले षटकार?
सुरुवातीला वैभव सूर्यवंशीने अत्यंत संयमीत खेळी खेळली. त्याने एका टप्प्यानंतर खेळी बदलली आणि झटपट अर्धशतक पूर्ण केले. त्याविषयी त्याने महत्त्वाची माहिती दिली. आपण कधीही दोन अथवा तीन षटकार सहज ठोकू शकतो याचा मला विश्वास होता. पण तरीही मी संयमाने खेळलो. मला घाई करून विकेट द्यायची नव्हती. दीर्घकाळ धावपट्टीवर टिकून राहायचे होते असे मनोगत त्याने व्यक्त केले.
तर दीर्घकाळ खेळत राहिल
कमी वयात इतकी लोकप्रियता मिळवल्याबद्दल त्याला प्रश्न विचारण्यात आला. मी या गोष्टीकडे फार लक्ष देत नाही. मी वृत्तपत्र वाचत नाही. मी लोकप्रियता अथवा इतर गोष्टींचा फार विचार करत नाही. मला वाटतं की आता कुठे माझी सुरुवात झाली आहे. जर माझी कारकीर्द दीर्घकाळ राहिली तर मी अधिक काळ खेळत राहिल. तेव्हा सुद्धा लोक माझ्याविषयी काही ना काही चर्चा करतीलच. त्यामुळे मी माझ्या खेळावर लक्ष्य देतो. कारण मला माझा प्रवास पूर्ण करायचा आहे, असे वैभव सूर्यवंशी म्हणाला. वैभव याला क्रिकेट जगतात मोठी खेळी खेळायचे असल्याचे या वक्तव्यावरून दिसून येते.
Leave a Reply