
१५ वर्षीय वैभव सूर्यवंशी हा भारताचा उदयोन्मुख क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याने नुकतेच इंग्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत भारतासाठी एकूण सहा टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. असे असूनही, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी १९ वर्षांखालील मालिकेसाठी त्याची निवड झालेली नाही, तर दुसरीकडे वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर आणि राहुल द्रविडचा मुलगा अन्वय यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. केवळ १५ वर्षांच्या वैभवचा १९ वर्षांखालील संघात समावेश का करण्यात आला नाही. वैभवच्या निवडीमागे बीसीसीआयचा एक कठोर नियम आहे.
बीसीसीआयने २०१६ मध्ये एक नियम लागू केला होता. त्या नियमानुसार, एक खेळाडू आपल्या आयुष्यात फक्त एकदाच १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत खेळू शकतो. याचा अर्थ असा की, जर एखादा खेळाडू वयाच्या १५ किंवा १७ व्या वर्षी अंडर-१९ विश्वचषकात खेळला असेल, तर तो १९ वर्षांचा होण्यापूर्वी पुन्हा विश्वचषक झाल्यास, वयाने पात्र असूनही त्याची संघात निवड होणार नाही. या नियमामुळे वॉशिंग्टन सुंदरला २०१८ च्या अंडर-१९ विश्वचषकात खेळता आले नाही.
वैभव सूर्यवंशी २०२६ च्या अंडर-१९ विश्वचषकात आधीच खेळला आहे आणि बीसीसीआयच्या नियमांमुळे तो पुन्हा खेळू शकत नाही. यामुळेच निवड समितीने इतर नवीन खेळाडूंना संधी देण्यासाठी त्याला यावेळी अंडर-१९ संघात स्थान दिले नाही. ऑस्ट्रेलियाचा अंडर-१९ संघ १८ सप्टेंबरपासून भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघ १८, २१ आणि २३ सप्टेंबर रोजी राजकोटमध्ये तीन एकदिवसीय सामने खेळतील. यानंतर दोन मल्टी डे सामने खेळले जातील: पहिला राजकोटमध्ये २७ ते ३० सप्टेंबर दरम्यान, आणि दुसरा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या ‘बी’ मैदानावर ५ ते ८ ऑक्टोबर दरम्यान.
लेग-स्पिन अष्टपैलू आर्यवीर सेहवाग आणि यष्टीरक्षक-फलंदाज अन्वय द्रविड यांची १५ सदस्यीय एकदिवसीय संघात निवड झाली होती, परंतु दोघांपैकी कोणालाही दोन मल्टी डे सामन्यांमध्ये स्थान मिळाले नाही. आर्यवीर सध्या २०२६ च्या दिल्ली प्रीमियर लीग (डीपीएल) मध्ये वेस्ट दिल्ली लायन्स संघाकडून खेळत असून, त्याने आतापर्यंत फक्त दोन सामने खेळले आहेत. आर्यवीरची १९ वर्षांखालील एकदिवसीय संघात निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे, तर अन्वय यापूर्वी या संघाचा भाग होता.
Leave a Reply