
शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि आमदार वैभव नाईक यांनी शिंदे गटातील सहा खासदारांवर जोरदार टीका केली आहे. हे खासदार विकासकामांसाठी नव्हे, तर केवळ स्वार्थासाठी शिंदे गटात गेले असून त्यांचा विकासकामांशी काडीमात्र संबंध नाही, असा आरोप त्यांनी केला.
माध्यमांशी संवाद साधताना वैभव नाईक म्हणाले की, जनतेला सर्व गोष्टींची जाणीव असून आगामी निवडणुकांमध्ये मतदार या फुटीर खासदारांना धडा शिकवतील. लोकसभा निवडणुकीत जनतेने अनेक ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट केली असून भविष्यातही मतदार योग्य निर्णय घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी माजी खासदार संजय दीना पाटील, वाघचौरे आणि इतर नेत्यांचाही उल्लेख केला. “हे नेते यापूर्वी आमदार आणि खासदार होते. त्यावेळी ते सत्ताधारी पक्षासोबत होते. मात्र, तरीही जनतेने त्यांना नाकारले होते, ही वस्तुस्थिती आहे,” असे नाईक म्हणाले.
शिंदे गटात गेलेल्या खासदारांवर टीका करताना नाईक यांनी जनतेच्या प्रश्नांपेक्षा वैयक्तिक राजकीय स्वार्थाला प्राधान्य देण्यात आल्याचा आरोप केला. आगामी निवडणुकांमध्ये मतदार या सर्व बाबींचा विचार करून निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, वैभव नाईक यांच्या या वक्तव्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गटातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
Leave a Reply