
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या CJP आंदोलनाला भेट दिल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. आंदोलनाला आपला पाठिंबा पहिल्या दिवसापासून असल्याचे स्पष्ट करत त्यांनी सरकारने आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्यात अपयश आल्याचा आरोप केला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, “मी काल केवळ अभिजित दीपके आणि आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांची भेट घेण्यासाठी गेलो होतो. आंदोलनाला माझा पाठिंबा कालपासून नाही, तर पहिल्या दिवसापासून आहे. सरकारने आंदोलनकर्त्यांशी सुरुवातीलाच चर्चा केली असती, तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती.”
ते पुढे म्हणाले की, कोणतेही आंदोलन झाल्यास सरकारने संबंधितांशी संवाद साधणे, त्यांच्या मागण्या ऐकून घेणे आणि गैरसमज दूर करणे ही लोकशाहीची जबाबदारी आहे. “अभिजित दीपके आणि सोनम वांगचुक यांच्याशी पहिल्याच दिवशी चर्चा झाली असती, तर आंदोलन इतके तीव्र झाले नसते,” असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या आंदोलनांचा संदर्भ देत, त्या काळात सरकारने संवादाचा मार्ग स्वीकारला होता, असे सांगितले. “लोकांवर आपले मत जबरदस्तीने लादणे आणि त्यांचे म्हणणे न ऐकणे, ही लोकशाही नसून हुकूमशाही आहे,” अशी टीका त्यांनी केली.
आंदोलनादरम्यान विद्यार्थी आणि महिलांवर झालेल्या कथित पोलिस कारवाईवरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “लहान मुली आणि महिलांशी ज्या पद्धतीने वागण्यात आले, ते कोणत्याही संस्कृतीला शोभणारे नाही. एखाद्या मंत्र्याचा राजीनामा मागणे हा लोकशाहीतील अधिकार आहे. त्यात गैर काय आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरे यांनी सरकारने आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्याचे आवाहन करत, विद्यार्थ्यांना आधार देण्याऐवजी त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. “जर सरकार लोकशाही मानत असेल, तर आंदोलनकर्त्यांशी बोलण्यास कमीपणा का वाटतो?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
Leave a Reply