
चार वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली. दोन गट तयार झाले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदारांनी भाजपसोबत जाऊन महाराष्ट्रात सरकार बनवलं. आज शिवसेना एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या दोन गटात विभागलेली आहे. अधिकृत शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंकडे आहे तर उद्धव ठाकरे यांना मशाल चिन्हावर निवडणुका लढवाव्या लागत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अधिकृत पक्ष म्हणून मान्यता दिली. धनुष्यबाण चिन्ह त्यांच्याकडे सोपवलं. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं. मागच्या अडीच-तीन वर्षांपासून या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह यावर कुणाचा अधिकार हा निकाल अद्याप प्रलंबित आहे.आज याप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.
सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमला बागची आणि व्ही मोहना यांच्या विशेष खंडपीठासमोर सुनावणी पार पडणार आहे. ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल हे उद्धव सेनेची बाजू मांडत आहेत. आज सुनावणी असल्याने राजकीय पक्षांचे आणि कार्यकर्त्यांचे या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.पक्षाचे मूळ चिन्ह धनुष्यबाण आपल्यालाच मिळेल. चिन्ह आपल्याला मिळालं नाही तर ते गोठवलं जाईल, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी संपर्कप्रमुखांच्या बैठकीत केलं होतं. यामुळे आजच्या सुनावणीला महत्त्व प्राप्त झालं आहे. आमदार म्हणजे पक्ष नव्हे असा ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. निवडणूक आयोगाने विधिमंडळातील बहुमत बघितलं, पण त्याचवेळी पक्षीय बहुमताकडे दुर्लक्ष केले. विधानसभा अध्यक्षांनी बंडखोर आमदारांना अपात्र न ठरवून चूक केली असे बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडण्यात आली.
दोन्ही शिवसेनेच्या भवितव्याच्या दृष्टीने हा निकाल महत्वाचा
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल या प्रकरणात महत्वपूर्ण ठरणार आहे. चार वर्षात राज्यातील राजकारण मोठ्या प्रमाणात बदलून गेलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या तुलनेत एकनाथ शिंदे यांची शिवसेना अधिक भक्कम झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे आज 13 खासदार, 57 आमदार आणि मोठ्या संख्येने नगरसेवक त्यांच्यासोबत आहेत. त्याचवेळी उद्धव ठाकरे गट वेळेबरोबर कमकुवत होत चालला आहे. अशावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने मोठा फरक पडू शकतो. दोन्ही शिवसेनेच्या भवितव्याच्या दृष्टीने हा निकाल महत्वाचा ठरणार आहे.
Leave a Reply