
देशातील विविध राज्यांतील निवडणुकांच्या धामधुमीत केंद्र सरकारकडून ‘नारी शक्ती वंदन विधेयक’ पुन्हा चर्चेत आलं असून, या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापलं आहे. या विधेयकासह विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकही केंद्र सरकारच्या अजेंड्यावर असल्याने विरोधकांनी तीव्र आक्षेप नोंदवले आहेत. या विधेयकाच्या टायमिंग आणि हेतूबाबत विरोधी पक्षांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असून, राजकीय वर्तुळात यावरून जोरदार वाद रंगला आहे.
दरम्यान, आज झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ‘नारी शक्ती वंदन विधेयक’ हे सप्टेंबर 2023 मध्ये मंजूर झालं असलं तरी, केंद्र सरकार महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर देशाची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला. राऊत यांनी पुढे म्हटलं की, 2011 च्या जनगणनेच्या आधारे हे विधेयक लागू करण्याची चर्चा आहे, तसेच मतदारसंघांच्या पुनर्रचनेसाठी स्वतंत्र विधेयक आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. जर हे विधेयक खरंच ऐतिहासिक असेल, तर सध्याच्या व्यवस्थेतच ते लागू का केलं जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसंच, 800 पेक्षा अधिक नवीन मतदारसंघ निर्माण करून हे विधेयक लागू करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत, हे ‘नारी शक्ती’ नव्हे तर ‘भाजपा शक्ती’ विधेयक असल्याची टीकाही त्यांनी केली.
याशिवाय, या विधेयकाला संसदेत मंजुरी मिळणार नाही आणि आम्ही ते मंजूर होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. या पार्श्वभूमीवर ‘नारी शक्ती वंदन विधेयका’वरून राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Leave a Reply