
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाला तीन महिने पूर्ण झाले असतानाही तपासात ठोस पुरावे नसल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी आज पुण्यातील सीआयडी कार्यालयात हजेरी लावत तपास यंत्रणांवर नाराजी व्यक्त केली.
माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी काही धक्कादायक आरोप करत तपासाचा वेगळा अँगल समोर आणला. त्यांनी भोंदू बाबा अशोक खरात याच्या नावाचा उल्लेख करत, 27 ते 29 जानेवारीदरम्यान त्याच्या बँक खात्यात झालेल्या मोठ्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच बारामतीतील एका स्थानिक राजकीय नेत्याचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. रोहित पवार यांनी दावा केला की, अजित पवार यांच्या निधनापूर्वी काटेवाडी, बारामती आणि मुंबईतील देवगिरी बंगल्याबाहेर काही संशयास्पद पूजा करण्यात आल्या होत्या. काटेवाडीत एका झाडाला बकरीची पूजा करून टांगण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या घटनांमागील उद्देश काय, याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
“आम्ही अंधश्रद्धांवर विश्वास ठेवत नाही, मात्र या सर्व प्रकारांमागे कोणते षडयंत्र आहे का?, हे शोधणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले. तसेच या प्रकरणातील कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) मिळाल्याचे सांगत, त्यातून पुढे मोठे खुलासे होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, तपास यंत्रणांकडून या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.
Leave a Reply