
मनसे नेते आणि कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील यांना गेल्या विधानसभेत यश मिळाले नाही. कटाई हे त्यांचे गाव आहे. या गावात 1400 मते आहेत. पण त्यातील एकही मत राजू पाटील यांना मिळाले नसल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापूर्वी केला होता. त्यांना आमदारकीच्या निवडणुकीत पराभवाला तोंड द्यावे लागले. त्यानंतर आता SIR प्रक्रियेत राजू पाटील यांच्या मतदार संघातील धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. एसआयआर प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात मतदारांना वगळण्यात आले आहे. त्यावर राजू पाटील यांनी मोठे भाष्य केले आहे.
जवळपास 95 टक्के नावं वगळली
SIR प्रक्रियेत मतदार यादीतून किती मतदारांची नावं कमी झाली आहेत, यावर मनसे नेते राजू पाटील यांनी मोठे भाष्य केले आहे. आपल्या मतदार संघातील जवळ जवळ 2 लाख 55 हजार नावं कमी झालेली आहेत. त्यातील 2 लाख 37 हजार नावं ही ट्रेसेबल नाहीत. त्यांचे प्रमाण 94.60 टक्के इतके आहे. आम्ही निवडणूक आयोगाला गठ्ठेच्या गठ्ठे दिली आहेत. ही नावं दुबार आहेत. ही माणसं इथे राहत नाहीत, असं आम्ही त्यावेळी सांगितले. पण निवडणूक आयोगाने त्यावेळी काही ऐकलं नाही असा आरोप राजू पाटील यांनी केला.
नाव नोंदवण्याची संधी
राज्यात दोन कोटींहून अधिक नावं वगळण्यात आली आहेत. या सर्वांसंदर्भात त्यांनी मोठे आवाहन राज्यातील जनतेला केले आहे. जर तुमचे नाव मतदार यादीत नसेल तर सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत तुम्हाला अजूनही वेळ आहे. नाव नोंदवता येणार आहे. यानंतर मात्र ही प्रक्रिया अधिक किचकट होणार आहे. यामुळेच आताच लक्षपूर्वक मतदार यादीत तुमचं नाव नोंदवा असे आवाहन राजू पाटील यांनी केले.
बोगस मतदारांचं पितळ उघड पडणार
दोन कोटींहून मतदारांचे नाव वगळल्याप्रकरणात मनसे आंदोलन करणार का? याचेही उत्तर त्यांनी दिले. मागे सुद्धा राज ठाकरे यांनी ईव्हीएमविरोधात सर्व पक्षांना एकत्र केले होते. त्यात काही पक्ष आले नाही. आम्ही फुगवलेल्या मतदार यादीविरोधात मोर्चा काढला होता. वोटचोरीविरोधात आम्ही मोर्चा काढला होता. आम्ही या गोष्टी सतत करत असतो. पण लोकांनी या गोष्टीत सहभाग नोंदवला पाहिजे. आता एक संधी आलेली आहे. जी मराठी नावं वगळलेली आहे, त्यांनी मतदार यादीत नाव नोंदवायला हवी. जे इथं राहतच नाही, त्यांच पितळ उघडं पडणार आहे, असे राजू पाटील म्हणाले.
Leave a Reply