
मिरा-भाईंदरमध्ये भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि मंत्री प्रताप सरनाईक यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये शहरातील नाट्यगृह आणि कलादालनावरून जोरदार जुंपली आहे. भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्यानंतर आमदार नरेंद्र मेहता यांनी राजीनामा देणार असल्याचे म्हटलं होते. परंतु भाजपच्या मंत्र्यांनी मेहतांवरील भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध केले आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्यावर मिरा-भाईंदरमध्ये दिवाळीपेक्षा मोठी दिवाळी साजरी होईल, अशी टीका मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली.
प्रताप सरनाईक यांनी नरेंद्र मेहतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. मंत्री सरनाईक यांनी म्हटलं की, ‘नरेंद्र मेहता यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्या मंत्र्यांनी सिद्ध केले आहेत. त्यांनी राजीनामा दिला तर मिरा भाईंदरमध्ये दिवाळीपेक्षा मोठी दिवाळी साजरी होईल. ही दिवाळी लोक साजरी करतील. माझी गरजही लागणार नाही’.
परप्रांतीय रिक्षा चालकांच्या मराठी भाषा सक्तीच्या मुदतवाढीवर मंत्री सरनाईक यांनी भाष्य केलं. ‘ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वर्षांची मुदतवाढ दिली आहे. कुठेही मराठी शिकवण्याचं अभियान थांबवण्यास सांगितलं नाही. आमची नोटीस 20 ऑगस्ट 2026 रोजी अमराठी रिक्षा चालकांना दिली होती. ती नोटीस 28 ऑगस्ट 2026 पासून चालू राहील. याला फक्त मुदतवाढ दिलेली आहे. मुदतवाढीच्या दरम्यान बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने सुरू झालेलं अभियान हे एकनाथ शिंदे यांनी चालू ठेवायला सांगितलं आहे. हे अभियान पुढेही चालू राहणार आहे. भविष्यात अमराठी रिक्षा चालकांनी मराठी शिकावी, यासाठी प्रयत्न करत आहोत. आम्ही प्रेमाने शिकवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे 1 लाख 65 हजार 700 अमराठी रिक्षा-टॅक्सी चालक मराठी शिकले. भविष्यातही मराठी शिकवू. दांडुकीच्या धाकाने, दादागिरी करून अमराठी रिक्षाचालकांना त्रास दिला जात असेल, तर त्यांच्यवर कायदेशीर कारवाई होईल’.
मिरा-भाईंदरमधून मराठी माणसांना हद्दपार करण्याचा डाव रचला जात आहे, या आरोपावर सरनाईक म्हणाले, आदिवासींच्या जमिनी लाटणे. भूमिपुत्रांनी जमिनी दिल्या नाहीत, त्यामुळे त्यांच्या घरांवर बुलडोझर फिरवणे, असे प्रकार सर्वसामान्य मराठी माणसांच्या नशिबी येत आहेत. त्यामुळे मिरा-भाईंदरमधून मराठी माणसांना हद्दपार करण्याचा डाव आहे का, असा प्रश्न पडतो. मिरा-भाईंदरमधील सर्वसामान्य मराठी माणूस, भूमीपूत्र, आदिवासी फक्त 18 टक्के आहेत. 18 टक्के लोकांना कचाट्यात सापडून गुन्हे दाखल करून हद्दपार करण्याचा प्रयत्न करत असेल, मंत्री प्रताप सरनाईक कदापी सहन करणार नाही. बाळासाहेब ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यांवर शिवसेनेची स्थापना केली. हिंदूत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना फोफावत गेली. त्यामुळे या मुद्द्यासाठी झगडत आहोत. ते काम करत राहू. आम्ही मराठी माणसांना हद्दपार होऊ देणार नाही’.
Leave a Reply