
विधानसभेच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका सूचक विधानाची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. “ऑपरेशन यशस्वी आणि बॉडीही सुदृढ” असे वक्तव्य करत फडणवीस यांनी प्रथमच “ऑपरेशन टायगर” संदर्भात अप्रत्यक्ष भाष्य केल्याचे मानले जात आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेत (शिंदे गट) खासदारांच्या प्रवेशासाठी आवश्यक संख्याबळ पूर्ण करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची ठरली. या संपूर्ण प्रक्रियेत त्यांनी महत्त्वाची समन्वयकाची भूमिका बजावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदे गटाकडून संबंधित खासदारांच्या प्रवेशाबाबत भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी तब्बल पाच वेळा चर्चा करण्यात आली होती. या खासदारांना भारतीय जनता पक्षात प्रवेश द्यायचा की शिंदे यांच्या शिवसेनेत सामील करून घ्यायचे, यावर बराच काळ निर्णय प्रलंबित होता.
दरम्यान, बहुतांश खासदारांची भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, संबंधित खासदारांना शिंदे यांच्या शिवसेनेतच सामावून घ्यावे, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, फडणवीस यांनी घेतलेल्या बैठकीनंतरच शिंदे गटाला दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून हिरवा कंदील मिळाला. तसेच सहाव्या खासदाराच्या प्रवेशासाठीही फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून आगामी काळात यावर अधिकृत प्रतिक्रिया आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Leave a Reply