
नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरामुळे सर्व काही उद्ध्वस्त झालं आहे. या महापुरामुळे अनेक इमारती कोसळल्या, पूल पडले. या घटनेत आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे, तर अजूनही अनेकजण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान भारतामधून फिरण्यासाठी नेपाळलला गेलेले काही भारतीय पर्यटक देखील तिकडेच अडकले आहेत. सरकारकडून या लोकांना भारतात परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे या महापुराचा फटका आता भारताला देखील बसण्याची शक्यता आहे.
नेपाळच्या महापुराचा फटका हा बिहारला बसला आहे. गंगा नदीची पाणीपातळी अचानक वाढल्यामुळे नदी काठच्या सखल भागातील झोपड्या पाण्याखाली गेल्या आहेत. नेपाळ आणि तिबेटच्या सीमाभागात आलेल्या महापुरानंतर त्याचा थेट परिणाम बिहारची राजधानी पटनामध्ये गंगेच्या किनाऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे. गंगेचा जलस्तर अचानक वाढल्याने नदीकाठच्या सखल भागात वसलेल्या अनेक झोपड्या आणि कच्ची घरे पाण्याखाली गेली आहेत.
नेपाळमधून वाहणाऱ्या गंडक आणि कोसी नद्यांद्वारे पाण्याचा मोठा विसर्ग झाल्यामुळे पाटण्यासह पश्चिम चंपारण, गोपाळगंज आणि सारण जिल्ह्यांत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गंगेच्या वाढत्या पाण्यामुळे किनाऱ्यावरील रहिवाशांना सुरक्षित आणि उंच ठिकाणी जाण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. परिस्थिती बिकट होण्याची शक्यता लक्षात घेऊन, पाटणा आणि आसपासच्या भागात NDRF व SDRF च्या तुकड्यांना अलर्टवर ठेवण्यात आले असून, गंगेच्या पाणी पातळीवर 24 तास देखरेख ठेवली जात आहे.
दरम्यान दुसरीकडे नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 प्रवाशांचा पुढचा प्रवास सुरू झाला आहे, हे सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. नागपूरचे सर्व 106 प्रवासी काठमांडूवरून दानापूर (बिहार) करिता सुखरुप निघाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोननंतर काठमांडूवरून जनकपूरपर्यंत नेपाळचे खासदार संदीप राणा यांनी या प्रवाशांच्या प्रवासाची व्यवस्था केली आहे. हे सर्व लोक जनकपूर (बिहार) बॉर्डरला उद्या सकाळी पोहोचणार आहेत, त्यानंतर ते रेल्वेने गावी परतणार आहेत.
Leave a Reply