
नागपूर शहरातील पाचपावली परिसरातील कमाल चौकात भरदिवसा गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत अजय चिंचखेडे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. मात्र, गोळी लक्ष्य चुकल्याने अजय चिंचखेडे थोडक्यात बचावले असून मोठी दुर्घटना टळली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कमाल चौक परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी अजय चिंचखेडे यांच्यावर गोळीबार केला. गोळी लक्ष्यावर न लागल्याने त्यांचा जीव वाचला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राथमिक तपासात हा हल्ला जुन्या वैमनस्यातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथके तैनात केली आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. हल्ल्यामागील नेमके कारण आणि आरोपींचा उद्देश काय होता, याचा तपास सध्या सुरू असून, फरार आरोपींचा शोध वेगाने सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Leave a Reply