
पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. ओंकारेश्वर येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. परीक्षांमधील पेपरफुटी, अनियमितता आणि अभ्यासक्रमातील बदलांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याचा आरोप करत त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा संताप विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
या आंदोलनासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी महाराष्ट्र सरकारला पूर्णपणे अपयशी ठरवले आहे. सुळे म्हणाल्या की, “आपली मुलं शिक्षण सोडून रस्त्यावर येत आहेत, हे सरकारचे अपयश आहे.” त्यांनी सरकारला जबाबदार व्यक्ती पाठवून विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याचे आवाहन केले. पेपरफुटीच्या प्रकरणांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून कारवाई का केली जात नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांनी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी केली असून, सरकार विद्यार्थ्यांशी संवाद साधत नसल्यास ते अपयशी ठरत असल्याचे सुळे यांनी नमूद केले.
Leave a Reply