
शिवसेना नेते किरण पावसकर यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटावर जोरदार टीका केली असून, त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचा दावा केला आहे. ठाकरे गटातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असताना पावसकर यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, सहा खासदारांच्या प्रवेशावेळी शिवसेनेत आनंदाचे वातावरण होते, तर दुसरीकडे ठाकरे गटात निराशा पसरली होती. या घडामोडींवरून लक्ष हटवण्यासाठी काहींनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा आधार घेतल्याचा आरोप त्यांनी केला.
बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्पष्ट करत पावसकर म्हणाले की, त्यांच्या वक्तव्याचा संदर्भ चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात आला. १९ जून रोजी झालेल्या ठाकरे गटाच्या वर्धापन दिन कार्यक्रमातील काही नेत्यांच्या वक्तव्यांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली होती, मात्र त्याचा विपर्यास करून तो बाळासाहेबांशी जोडण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. “आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आहोत. बाळासाहेबांचा अपमान झाला नाही, केला नाही आणि होणारही नाही. मी उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोललो होतो, बाळासाहेबांविषयी नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही अप्रत्यक्ष निशाणा साधला. “शिवसेना प्रमुखांनी उद्धव ठाकरेंना सांभाळण्याची जबाबदारी आमच्यावर सोपवली होती आणि आम्ही ती पार पाडली,” असे सांगत त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाचाही उल्लेख केला. बाळासाहेब ठाकरे यांनी ३५ वर्षांपूर्वी स्वतः सही करून आपली नियुक्ती केली होती, २००८ मध्ये आपण आमदार झालो आणि त्यानंतर केवळ उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता, असेही त्यांनी नमूद केले.
तसेच कोविड काळातील कथित घोटाळ्यांच्या मुद्द्यावरून त्यांनी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर टीका केली. “आपले काळे धंदे लपवण्यासाठी बाळासाहेबांचे नाव वापरू नका,” असा टोला त्यांनी लगावला. याशिवाय संजय राऊत यांच्यावरही टीका करत त्यांनी अनेक वैयक्तिक आणि राजकीय संदर्भ उपस्थित केले.
दरम्यान, आगामी काळात ठाकरे गटाला आणखी धक्के बसण्याचे संकेत देत पावसकर यांनी मोठा दावा केला. “काही दिवसांत आमदार आणि नगरसेवकही शिवसेनेत प्रवेश करतील. त्यावेळी याच ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन त्याची माहिती देईन,” असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले असून ठाकरे गटातील आणखी काही नेते पक्षांतर करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply