
चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून, त्यांचे निकाल 4 मे रोजी जाहीर होणार आहेत. निकालापूर्वीच राजकीय वातावरण तापले असून, विविध संस्थांच्या एक्झिट पोलमुळे सत्तासमीकरणांबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्याचे मतदान पूर्ण झाल्यानंतर आलेल्या एक्झिट पोलमध्ये मोठा उलटफेर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या अंदाजानुसार, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला धक्का बसू शकतो आणि भाजप सत्तेच्या जवळ पोहोचू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, आसाममध्ये भाजप आपली सत्ता कायम राखेल, असेही एक्झिट पोल सूचित करत आहेत. तर केरळमध्ये सर्वाधिक धक्कादायक चित्र समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अनेक दशकांपासून डाव्यांचा बालेकिल्ला असलेल्या केरळमध्ये यावेळी सत्तांतर होऊ शकते, असे संकेत मिळत आहेत. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटला (एलडीएफ) सुमारे 58 ते 68 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर काँग्रेसप्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला (यूडीएफ) 66 ते 76 जागा मिळू शकतात. भाजपला 10 ते 14 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यामुळे केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डाव्यांचा पारंपरिक गड असलेल्या या राज्यात यावेळी मतदार वेगळा कौल देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता प्रत्यक्ष निकालात हे अंदाज खरे ठरतात की उलटफेर होतो, हे 4 मे रोजी स्पष्ट होणार आहे.
Leave a Reply