
आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्सला 40 धावांनी मात दिली. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा संघ 20 षटकात 6 गडी गमवून 159 धावा करू शकला आणि विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्स संघ 18 षटकात सर्व गडी गमवून 119 धावा करू शकला. खरं तर हा सामना लखनौ आरामात जिंकेल असं वाटलं होतं. पण राजस्थान रॉयल्सने 40 धावांनी हा सामना जिंकून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. हा सामना राजस्थान रॉयल्सने जिंकला असला तरी नांद्रे बर्गर चर्चेत आला आहे. लखनौचा कर्णधार ऋषभ पंतसमोर केलेली कृती त्याला भोवली. नांद्रे बर्गरने आयपीएल आचारसंहितेचं उल्लंघ केल्याचं उघड झालं. सामनाधिकाऱ्यांसमोर त्याला उभं केलं गेले, तेव्हा त्याने चूक कबूल केली आणि शिक्षा पात्र ठरला. नांद्रे बर्गरला शिक्षा म्हणून सामना फीच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच त्याच्या पदरात 1 डिमेरिट पॉइंट पडला आहे.
राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज नांद्रे बर्गरने आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.5 उल्लंघ केल्याचं सिद्ध झालं. त्याने आपली चूक झाल्याची कबुलीही सामनाधिकाऱ्यांसमोर दिली. लखनौ सुपर जायंट्स संघ धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या षटकात नांद्रे बर्गरने ऋषभ पंतची विकेट काढली. या विकेटनंतर त्याने सेंड ऑफचा इशारा केला. पंतला आपलं खातंही खोलता आलं नाही. खरं तर असे इशारे क्रिकेट नियमांचं उल्लंघन मानलं जातं. नांद्रे बर्गरने ही चूक केली आणि त्याला शिक्षा सुनावण्यात आली.
आयपीएलने आपल्या निवेदनात स्पष्ट केलं की, “नांद्रे बर्गरने कलम 2.5 अंतर्गत स्तर 1 चा गुन्हा कबूल केला आहे. यामध्ये अशा भाषेचा, कृतींचा किंवा हावभावांचा वापर करणे समाविष्ट आहे, ज्यामुळे दुसऱ्या खेळाडूचा अपमान होण्याची किंवा त्याच्याकडून आक्रमक प्रतिक्रिया येण्याची शक्यता असते. त्याने सामनाधिकाऱ्याने लादलेली शिक्षा स्वीकारली आहे.”
दुसरीकडे, कर्णधार ऋषभ पंतने पराभवाची कारण मीमांसा करताना सांगितलं की, “मला वाटते हे स्पष्ट करणे कठीण आहे. म्हणजे, निश्चितच आमची फलंदाजी आम्हाला निराश करत आहे, पण त्याच वेळी, एक संघ म्हणून, एक गट म्हणून आम्ही निराश आहोत, पण त्याच वेळी, तुम्हाला मार्ग शोधत राहावे लागेल. तुम्हाला उत्तरे आत शोधावी लागतील, बाहेर नाही, पण सध्या तरी परिस्थिती अशीच आहे.”
Leave a Reply