
Asia Cup Match 2026: दुबईमध्ये सुरू असलेल्या महिला टी-२० आशिया कपमध्ये, भारतीय संघ आपला पहिला सामना ३० ऑगस्ट रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर थायलंडच्या महिला संघाविरुद्ध खेळणार आहे. २०२६ च्या टी-२० विश्वचषकात अपेक्षेप्रमाणे कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आशिया कपमध्ये ‘अ’ गटात असलेल्या भारतीय संघाचा सामना पाकिस्तानी महिला संघाशीही होणार असून, हा सामना ५ सप्टेंबर रोजी खेळला जाईल. या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि भारतीय संघाच्या खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करतील की नाही याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मजूमदार यांनीही या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली आहे.
थायलंडविरुद्धच्या भारतीय महिला संघाच्या पहिल्या टी-२० आशिया कप सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत, पाकिस्तानविरुद्धच्या आशिया कप सामन्यादरम्यान झालेल्या हस्तांदोलनाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार म्हणाले की, “खेळाडू मैदानाबाहेरील बाबींवर लक्ष केंद्रित करत नाहीत. सध्या त्यांचे संपूर्ण लक्ष ३० ऑगस्ट रोजी थायलंड महिला संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यावर आहे आणि भारत-पाकिस्तान सामना झाल्यावर ते यावर चर्चा करतील. हा एक तरुण संघ आहे आणि सुधारणेला खूप वाव आहे. आम्ही चांगला आणि आक्रमक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करत आहोत. आता आमचे ध्येय पुढील सहा महिन्यांत चांगली सुरुवात करणे हे आहे.” भारतीय संघाने यावर्षी आतापर्यंत खेळलेल्या १६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी नऊ सामने गमावले आहेत.
महिला टी-२० आशिया कपच्या तयारीसंदर्भात, भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणाले की, “येथील खेळपट्टी आणि हवामान पाहता फिरकी गोलंदाजांची भूमिका खूप महत्त्वाची असणार आहे, ज्यामध्ये आमच्या संघात विविध प्रकारचे फिरकी गोलंदाज आहेत आणि आम्ही त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करू. ” दरम्यान, भारतीय संघ जेमिमा रॉड्रिग्जशिवाय खेळायला गेला आहे, ज्याबाबत अमोल मुझुमदार म्हणाले की, “आम्हाला तिची उणीव भासेल कारण ती आमची एक महत्त्वाची खेळाडू आहे. ” सध्या, जेमिमा बंगळूरु येथील सीओईमध्ये तिच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.
Leave a Reply