
संपूर्ण राज्यात मान्सून दाखल झाला आहे, त्यामुळे जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरूवात झाली आहे. अनेक भागात अतिवृष्टी झाली असून नद्या-नाल्यांना पूर आला आहे. अशातच आता हवामान विभागाने पावसाचा नवा अंदाज वर्तवला आहे. यानुसार राज्याच्या काही भागात 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. राज्याच्या कोणत्या भागात कसा पाऊस असेल याबाबत माहिती जाणून घेऊयात.
5 दिवस विदर्भासाठी महत्त्वाचे
नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. प्रवीण कुमार यांनी सांगितले की, विदर्भात तीन ते सात जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या काळात काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या खाडीत एक सिस्टम डेव्हलप होत आहे, त्यामुळे विदर्भात चांगला पाऊस पडणार आहे. मात्र 3 तारखे पर्यंत काही भागात हलका तर काही भागात मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
जून महिन्यात कमी पाऊस
प्रवीण कुमार यांनी पुढे बोलताना सांगितले की, जून महिन्यात विदर्भात पाऊस पडला नसल्याने 50 टक्के पावसाची तूट निर्माण झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात तर 70 ते 80 टक्के पावसाची तूट आणि नागपूर जिल्ह्यात जवळपास 45 टक्के पावसाची तूट निर्माण झाली आहे. ही तूट लवकर भरून निघण्याची शक्यता कमी असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
जळगावमध्ये मुसळधार पावसाची हजेरी
जळगावमध्ये आज मुसळधार पाऊस कोसळला, या पावसामुळे रस्त्यावर सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. शहरातील नवी पेठ भागामध्ये तासाभराच्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर गुडघ्यापेक्षाही जास्त पाणी साचलं आहे. या साचलेल्या पाण्यामधूनच वाहनधारकांना वाट काढावी लागत असून मोठी कसरत करावी लागत आहे. पावसाच्या साचलेलं पाणी जाण्यासाठी व्यवस्था नसल्याने दुकानांच्या पायऱ्यापर्यंत पावसाचे पाणी पोहोचलेले आहे. गेल्या काही वर्षांपासून या भागातील नागरिकांना या त्रासाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित ही पाणी साचण्याची समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Leave a Reply