
महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीच्या निर्णयावरून नवा वाद निर्माण झाला असून, राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील रिक्षा व टॅक्सी चालकांवर मराठी भाषा सक्ती करण्याच्या निर्णयाला काही संघटनांकडून तीव्र विरोध होत असल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर सुमारे 14 लाख रिक्षाचालकांनी 4 मेपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. सरकारच्या आदेशानुसार, मोटार परिवहन विभागाकडून परवाना तपासणी मोहीम राबवली जाणार असून, चालकांना मराठी वाचता आणि लिहिता येतं का याची पडताळणी केली जाणार आहे. मराठी भाषा न येणाऱ्या चालकांवर कारवाई करत त्यांचे परवाने रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्थानिक भाषा येणं आवश्यक असल्याचं स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, या निर्णयाविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे. मीरा भाईंदरमध्ये स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारी दर्शवली.
या भूमिकेला विरोध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. मराठी भाषेचा अपमान झाल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या सर्व घडामोडींमुळे मराठी भाषा सक्तीचा मुद्दा अधिकच चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Leave a Reply