
दिल्लीतील संसद परिसरात सुरू असलेल्या आंदोलनावरून वातावरण अधिकच तापले असून, राज्यसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे. दिवसभर संसदेबाहेर आंदोलन सुरू असतानाही आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम असून, कोणत्याही परिस्थितीत संसद भवनाच्या दिशेने मोर्चा काढण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजित दीपके यांनी माध्यमांशी संवाद साधताना, आंदोलन मागे घेण्याचा कोणताही प्रश्न नसल्याचे स्पष्ट केले. आंदोलन सुरूच राहणार असून, विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी हा लढा अधिक तीव्र करण्यात येईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, या आंदोलनाचे पडसाद केवळ दिल्लीपुरते मर्यादित न राहता महाराष्ट्रातही उमटताना दिसत आहेत. पुणे, भिवंडी, नागपूर आणि कोल्हापूरसह विविध शहरांमध्ये विद्यार्थी आणि विविध संघटनांनी आंदोलन सुरू ठेवले आहे. शांततापूर्ण मार्गाने, घोषणाबाजी, पोस्टर्स, बॅनर्स आणि नाट्यरूप सादरीकरणाच्या माध्यमातून आंदोलनकर्ते आपल्या मागण्या मांडत आहेत.
महाराष्ट्रातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या या आंदोलनातून अभिजित दीपके आणि दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा व्यक्त करण्यात येत असून, विद्यार्थ्यांचा सहभाग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे दिल्लीतील आंदोलनाला आता राज्यभरातून मिळणारा पाठिंबा अधिक मजबूत होत असल्याचे चित्र समोर येत आहे.
Leave a Reply