
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात मध्यरात्री मोठी दुर्घटना घडली असून, नारपोली येथील गंगारामवाडी परिसरातील चार मजली कोहिनूर इमारत कोसळल्याने आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत आणखी काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना रात्री सुमारे 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली. संबंधित कोहिनूर इमारतीला यापूर्वीच महापालिकेने धोकादायक घोषित केले होते. इमारतीच्या एका विंगच्या तळमजल्यावरील खांबांच्या (पिलर) दुरुस्तीचे काम सुरू होते. संध्याकाळी सुमारे 7 वाजल्यापासून इमारतीला तडे जाऊ लागल्याने आणि इमारत झुकत असल्याचे लक्षात आल्यानंतर रात्री 8 वाजण्याच्या सुमारास प्रशासनाने इमारत रिकामी केली होती.
मात्र, काही रहिवासी आपले सामान काढण्यासाठी पुन्हा इमारतीत गेले असताना अचानक इमारतीचा मोठा भाग कोसळला आणि ही भीषण दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस, अग्निशमन दल आणि NDRF ची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
प्रशासनाने नागरिकांना घटनास्थळापासून दूर राहण्याचे आवाहन केले असून, दुर्घटनेच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू करण्यात आला आहे.
Leave a Reply