
UG-NEET पेपरफुटीविरोधात कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) मोठं आंदोलन उभारलं. 35 दिवसानंतर या आंदोलनाला यश आले. धर्मेंद्र प्रधान यांची विकेट पडली. या आंदोलनावर सत्ताधाऱ्यांकडून निशाणा साधला जात असताना आता बाबा रामदेव यांनी सुद्धा आंदोलनावर टीका केली आहे. Gen-Z आंदोलनामुळे देशाची बदनामी झाल्याचा अजब दावा त्यांनी केला. त्यावर खासदार संजय राऊत यांनी त्यांना 2011 मधील अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची आठवण करून दिली आणि महिलांचे कपडे घालून कोणी पळ काढला होता, असा सवाल केला.
रामदेवा बाबा म्हणाले काय?
Gen Z ने भारताला बदनाम केले. शिव्यांची वाखोली हे काही आपली संस्कृती आणि नैसर्गिक भाव नाही. आम्ही वयाने मोठ्या व्यक्तींचा नेहमी आदर केला आहे. आई- वडील आणि गुरूंचा आम्ही नेहमी सन्मान केला आहे. त्यांनी दाखवलेल्या रस्त्यावरूनच आपण पुढे जात आहोत. रस्त्यांवर उतरून देश चालणार नाही. देश हा संसदेतून आणि संविधानाआधारे चालतो. देशाचा शिक्षण मंत्री कोण असेल अथवा नसेल हे रस्त्यावर नाही ठरवता येणार, हे संसदेत ठरेल. देशाचे पंतप्रधान आणि संसद ते ठरवेल, अशी टीका बाबा रामदेव यांनी जेन झींच्या आंदोलनावर केली आहे. त्यांच्या या टीकेवर आता विरोधक आणि सीजेपीकडूनही प्रत्युत्तर आले आहे.
संजय राऊत यांनी सगळंच काढलं
बाबा रामदेव यांच्या या टीकेवर उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी खरमरीत उत्तर दिले आहे. 2011 मध्ये लोकपाल बिलासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जंतर मंतरवर मोठे आंदोलन उभारले होते. अण्णा हजारे यांच्यानंतर बाबा रामदेव आणि इतर नेते आंदोलनस्थळी ठाम मांडून बसले होते. त्याची आठवण करून देत राऊतांनी जहरी टीका केली. आंदोलनास्थळावरून महिलांचे कपडे घालून कोण पळाले हा कोणाचा अपमान होता, असा सवाल त्यांनी बाबा रामदेव यांना केला. तुम्ही पण तेव्हा आंदोलनस्थळी बसले होते ना, मग का बसले होते, ते तर जनतेला सांगा. तुम्ही आंदोलन केले तेव्हा भारताचा अपमान नाही झाला का? जेव्हा काँग्रेसचं, आमचं सरकार देशात येईल, तेव्हा राहुल गांधी यांचा सन्मान करणारे हेच रामदेव बाबा असतील, ते व्यापारी आहेत, अशी खरमरीत टीका संजय राऊत यांनी केली. 2011 मध्ये बाबा रामदेव यांनी सभास्थळावरून पोलीस कारवाईदरम्यान निसटण्याचा प्रयत्न केला होता, याची आठवण त्यांनी करून दिली.
Leave a Reply