
Nandurbar Unique Tradition: अक्षय तृतीयेनिमित्त सगळीकडं उत्साहाचं वातावरण आहे. अनेक मंदिरं आंब्यांची आरस करून सजवली आहेत. आज अनेक चांगल्या गोष्टींची सुरुवात करण्यात येते. त्यामुळे ती अक्षय, नष्ट न होणारी राहते, अशी मान्यता आहे. राज्यात अनेक ठिकाणी शेतात सालगडी, सालदार, शेतगडी नेमला जातो. त्यासाठी वर्षभराचा करार करण्यात येतो. शेतातील धान्याचा वाटा, काही पैसे अथवा मोठी रक्कम, कपडेलत्ते असा हा करार असतो. त्याचवेळी नंदुरबारमध्ये एक अनोखी प्रथा, परंपरा जपली आहे. येथे सालगडी होण्यासाठी मोठी कसोटी द्यावी लागते. त्यात पास होणाऱ्याला सालदारच नाही तर मालदार होता येते.
90 किलोचा उचला दगड, व्हा मालदार
शेतात सालगडी म्हणून निवडीसाठी नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरात सव्वा मण म्हणजे 90 किलोचा दगड उचलावा लागतो. वर्षांनुवर्षे ही परंपरा जपली गेली आहे. जो सालगडी, सालदार, शेतगडी सर्वात वजनदार दगड उचलेल त्याला तसाच दमदार दाम मोजून दिला जातो. त्याला सर्वाधिक रक्कम मिळते. ज्याला दगड उचलता आला नाही. त्यालाही शेतात काम मिळते. पण त्याला मोठी रक्कम दिली जात नाही. या अनोख्या परंपरेसाठी आणि सालगडी होण्यासाठी अनेक तरुण मेहनतीवर आणि आहारावर जोर देतात. अनेक जण सव्वा मण मोठा गोटा सहज उचलतात.
वर्षाभराचे ठरते पॅकेज
आजच्या AI च्या युगात कंपन्या कर्मचारी नियुक्तीसाठी अनेक सोपस्कार पार पडतात. त्यानंतर वर्षभराचे पॅकेज ठरवतात. त्यासोबत कर्मचाऱ्यांना काही सवलती आणि विशेष पॅकेजही दिल्या जाते. अगदी तसेच शेतीच्या कामासाठी सालदार नेमताना ही कसोटी पूर्ण करावी लागते. सालदाराने शेतात काम करण्याअगोदर त्याची ताकद आणि निग्रह जोखला जातो. त्यासाठी त्याला सर्वांसमक्ष अक्षय तृतीयेच्या मानाच्या दिवशी हा सव्वा मण दगड उचलावा लागतो. खानदेशात अक्षय़ तृतीयेला अनेक ठिकाणी ही परंपरा पाळली जाते. माळीवाड्यात वर्षानुवर्षे ही परंपरा जपली गेली आहे. आजही काही सालगड्यांनी ही कसोटी सहज पूर्ण केली. ताकद आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी मोठा दगड उचलून खांद्यावर घेतला.
60 हजार ते 1 लाखांहून अधिक पॅकेज
शेतगड्याची निवड करताना त्याची ताकद, चिकाटी आणि काम करण्याची क्षमता याची अनोख्या पद्धतीने चाचणी घेतली जाते. यावर्षी सालदारांचे पॅकेज साधारणपणे 60 हजार ते 1 लाख 10 हजार आणि त्यापेक्षाही अधिक आहे. वर्षाला कपड्याचे दोन जोड आणि काही धान्य देण्याची तरतूदही या पॅकेजमध्ये असते. तसेच त्याला सुट्टी आणि महत्त्वाच्या कामाच्यावेळी बाहेरगावी जाण्याची मुभा मिळते.
Leave a Reply