
गझल म्हटलं की कानावर पडतो तो सुरेल आवाज आणि मनाला मिळतो एक वेगळाच दिलासा. मात्र, एका गझलेची कहाणी ऐकली तर अंगावर काटा येतो. 70 च्या दशकात लिहिलेल्या या गझलेला ‘मनहूस गझल’ म्हणून ओळखलं जातं. विशेष म्हणजे, ही गझल गाणारे आणि लिहिणारे काही कलाकार अकाली मृत्यूमुखी पडल्याचा दावा केला जातो. त्यामुळे आजही अनेक गायक ही गझल गाणं टाळतात.
ही गझल प्रसिद्ध शायर इब्ने-इंशा यांनी लिहिली होती. ‘इंशा जी उठो अब कूच करो’ असे तिचे बोल आहेत. इब्ने-इंशा यांचा जन्म पंजाबमधील फिल्लौर येथे झाला होता. फाळणीनंतर ते पाकिस्तानात स्थायिक झाले. त्यांच्या लेखणीतून अनेक गाजलेल्या रचना निर्माण झाल्या. ‘कल चौदहवीं की रात थी’ या प्रसिद्ध गझलेचे बोलही त्यांनीच लिहिले होते.
अमानत अली यांनी गायली आणि काही महिन्यांत निधन
1974 मध्ये पटियाला घराण्याचे प्रसिद्ध गायक उस्ताद अमानत अली यांनी ही गझल पाकिस्तान टेलिव्हिजनवर गायली. त्यांच्या आवाजातील ही गझल प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. मात्र, त्यानंतर काही महिन्यांतच अवघ्या 52 व्या वर्षी अमानत अली यांचे निधन झाले. यानंतर या गझलेभोवती ‘मनहूस’ असल्याची चर्चा सुरू झाली.
या गझलेचे लेखक इब्ने-इंशा यांनाही पुढे कर्करोगाचे निदान झाले. लंडनमधील रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांनी आपल्या शेवटच्या पत्रांपैकी एका पत्रात अमानत अली यांची आठवण काढत या गझलेचा उल्लेख केला होता, अशी कथा सांगितली जाते. ‘ही मनहूस गझल आणखी किती जणांचे प्राण घेणार?’ असा आशय त्यांनी व्यक्त केल्याचे म्हटले जाते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचे निधन झाले.
अमानत अली यांच्या मुलाचाही मृत्यू
अमानत अली यांचा मुलगा असद अमानत अली यांनीही एका कार्यक्रमात ही गझल सादर केली होती. त्यानंतर काही महिन्यांतच त्यांचेही निधन झाले. त्यामुळे या गझलेशी संबंधित मृत्यूंच्या कहाण्यांना आणखी हवा मिळाली आणि गायकांमध्ये या गझलेबाबत भीती निर्माण झाली.
Leave a Reply