
बॉलिवूडच्या खजिन्यात अशी अनेक गाणी आहेत जी काळाच्या ओघातही अमर झाली आहेत. त्यापैकी एक आहे, १९६५ सालचं मोहम्मद रफी यांचं सदाबहार गाणं. आजही लोक ते मन लावून ऐकतात, पण बहुतांश श्रोत्यांना माहिती नाही की हे गाणं अर्धवट आहे. आता हे गाणं नेमकं कोणतं आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? जाणून घेऊया या गाण्याविषयी…
सिनेमा ‘काजल’ मधील हे गाणं आहे. गाण्याची सुरुवात ‘छू लेने दो नाजुक होठों को…’ अशी आहे. चित्रपटात हे गाणं राजकुमार आणि मीना कुमारी यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. हिरो हिरोईनला दारू ऑफर करतो, असा सीन आहे.
दिग्दर्शक राम माहेश्वरी यांना या सीनसाठी फक्त दोन ओळींची शायरी हवी होती. महान शायर साहिर लुधियानवी यांनी दोन सुंदर शेर लिहिले. ते फक्त संवाद म्हणून वापरण्याचा विचार होता. पण संगीतकार रवी यांना या दोन ओळी ऐकताच एक अप्रतिम चाल सुचली. त्यांनी दिग्दर्शकांकडे आग्रह धरला की, यावर पूर्ण गाणं बनवावं. दिग्दर्शक थोडे संकोचले. त्यांना वाटले की, हिरोला हे गाणं शोभणार नाही. शेवटी त्यांनी अट घातली “फक्त या दोन शेरांवरच गाणं बनवा.”
रेकॉर्डिंगच्या दिवशी जेव्हा मोहम्मद रफी यांनी गाणं गायलं, तेव्हा स्टुडिओत उपस्थित प्रत्येक जण थक्क झाला. गाण्याच्या दोन ओळी संपताच निर्माते आणि वितरक दिग्दर्शकांकडे वळले आणि म्हणाले, “इतकं सुंदर गाणं फक्त दोन ओळींमध्ये कसं संपवणार? आम्हाला तिसरं कडवं हवं आहे!”
तिसरं कडवं लिहिण्यासाठी साहिर लुधियानवी यांचा शोध घेण्यात आला, पण ते त्यावेळी उपलब्ध नव्हते. त्यामुळे गाणं अपूर्ण अवस्थेतच रेकॉर्ड करण्यात आलं. पण मोहम्मद रफी यांनी आपल्या मखमली आवाजात आणि अप्रतिम शैलीत गाणं इतक्या सुंदररीत्या संपवलं की, ऐकणाऱ्यांना ते अपूर्ण आहे हे कधीच समजलं नाही! गाण्यात दारूच्या नशेची भावना आहे, तरीही रफी साहेबांनी दारूला स्पर्शही न करता, केवळ आपल्या जादुई आवाजाने ते नशेतील गाणं अमर केलं.




Leave a Reply