
कुषोपणाने अगोदरच देशभरात बदनाम झालेला मेळघाट आता नव्याच दाव्याने प्रकाशझोतात आला आहे. मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील डोमा शासकीय निवासी आश्रमशाळा एकाएक भुताटकीने ओसाड पडली आहे. येथील काही विद्यार्थिंनींमध्ये विचित्र आणि भीतीदायक लक्षणे दिसू लागली. त्या रात्री रडायला लागल्या. अचानक मोठ्याने हसणे, शांत बसून राहणे, कोणत्याही गोष्टीला प्रतिसाद न देणे असे प्रकार वारंवार घडायला लागल्यानंतर प्रशासनही हादरले. या अफवांना आळा घालण्यासाठी अमरावतीचे जिल्हाधिकारी या आश्रमशाळेत रात्रभर तळ ठोकून होते. या शाळेत भुताटकीचा प्रकार असल्याची अफवा पसरल्याने उरल्यासुरल्या विद्यार्थिनींचे आणि त्यांच्या पालकांचे आवसान गळाले. आतापर्यंत 300 मुलांनी भुताच्या भीतीने शाळा सोडली. या घटनेची राज्यातच नाही तर देशपातळीवर चर्चा झडली आहे.
विचित्र वर्तनाने सर्वच हादरले
चिखलदरा हा आदिवासी बहुल तालुका आहे. येथील डोमा गावात शासकीय आश्रमशाळा आहे. शासकीय माध्यमिक आणि उच्च माध्यामिकपर्यंत शिक्षणाची व्यवस्था आहे. 22 जुलै रोजी चार मुलींनी या आश्रमशाळेत रात्रीच्या वेळी रडायला सुरुवात केली. त्या अचानक किंचाळल्या. रडायला लागल्या. मध्येच हसायला लागल्या. त्यांच्या विचित्र वर्तनाची माहिती इतर विद्यार्थिनींने आश्रमशाळेतील शिक्षकांना दिली. घरापासून दूर राहत असल्याने, आई-वडिलांची आठवण येत असल्याने आणि मानसिक ताणातून हा प्रकार घडल्याचा अंदाज लावण्यात आला.
पण चार विद्यार्थींनीचे हे लोण इतर विद्यार्थिंनीमध्ये पसरले. मास हिस्टेरिया सारखी हा प्रकार वाढला. विद्यार्थिंनीमधील विचित्र वर्तन वाढले. ही लक्षणं इतर मुलींमध्ये पसरली. तरी काही मुली या घटनेमुळे पुरत्या हादरल्या. त्यांनी आश्रमशाळेत राहण्यास नकार दिला. ही वार्ता वाऱ्यासारखी तालुक्यात पसरली. लागलीच अनेक मुलींचे पालक आश्रमशाळेत धडकले. आदिवासी समाजातील अंधश्रद्धेला भुताटकीचे खतपाणी मिळाले. या आश्रमशाळेत 263 मुलं आणि 345 मुली शिक्षण घेतात.
मोहाचे ‘झाड’, भुताटकीचा खेळ
आदिवासी आणि स्थानिकांची अशी समजूत आहे की, या आश्रमशाळेला खेटून मोहाची झाडं आहेत. या मोहाच्या झाडावर भूत असतात, असा त्यांचा समज आहे. मोहाचे झाडचं ‘झाड'(म्हणजे भुताचा वास असलेले ठिकाण) झाले आहे. या झाडांवर आत्मा, भूत वास्तव्यास असतात. ते झाड तोडल्यापासूनच हा भुताटकीचा प्रकार सुरू झाल्याचा त्यांचा समज आहे. हे आत्मेच विद्यार्थ्यांना त्रास देत असल्याची अफवाही पसरली आहे.
तर दुसरे एक कारण समोर आले आहे, त्यानुसार या आश्रमशाळेच्या मागील बाजूस आदिवासी, स्थानिकांच्या देवता आहेत. त्यांचे मंदिर आहे. शाळेचे सांडपाणी या मंदिराकडे सोडण्यात आले आहे. मंदिराच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे. यामुळे देव रुष्ट झाला आहे.
तिसरे अजून एक दावा करण्यात येत आहे. त्यानुसार, शाळेजवळी एका शेतात आदिवासी तरुणाचा मृत्यू झाला होता. त्याचा आत्माच भूत बनून विद्यार्थिंनींना त्रास देत आहे. पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एका ठराविक आणि विशिष्ट वयातील मुलींसोबतच हा प्रकार घडला आहे. त्यात विद्यार्थ्यांचा समावेश नाही. तर या मुली एकाच गावातील अथवा एकाच परिसरातील असल्याकडेही अनेकांनी लक्ष वेधले आहे.
जिल्हाधिकारी आश्रमशाळेत मुक्कामाला
भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या मेळघाट मधील डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांनी मुक्काम ठोकला. जिल्हाधिकारी आशिष येरेकर हे रात्री मुक्कामी थांबले. नवीन सुसज्ज इमारतीत वसतीगृह स्थलांतरीत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी भीती न बाळगता शाळेत मुक्कामी यावं असं आवाहन त्यांनी केले. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचे पाईक सप्तखंजेरीवादक संदीप पाल महाराज यांचे प्रबोधनात्मक कीर्तनाचे आयोजनही येथे करण्यात आले. पण तरीही विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील भीती काही केल्या जात नसल्याचे चित्र आहे.
Leave a Reply