
दिल्लीत सीजेपी अर्थात कॉकरोच जनता पार्टीने जोरदार आंदोलन केलं. तरुणांनी संपूर्ण जंतरमंतर डोक्यावर घेतलं. तब्बल आठ दिवस तरुणांनी जंतरमंतरवर जोरदार निदर्शने केल्यामुळे संपूर्ण दिल्ली हलली. या तरुणांपुढे ना पोलिसांची लाठी चालली ना पोलिसांची गोळी. तरुणांनी आपली मागणी मान्य होईपर्यंत जीवाची पर्वा केली नाही. त्यामुळे सरकारला झुकावं लागलं. तरुणांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या. या आंदोलनामुळे पोलीस आता अधिक सतर्क झाले आहेत. जंतरमंतरवर पुन्हा उग्र आंदोलन झाल्यास आंदोलकांना अटकाव करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.
जंतरमंतरवर कोणतंही आंदोलन असेल तर बॅरिकेड्स लावले जातात. पण आता प्रशासन नवीन कार्यवाही करत आहे. इकडून तिकडे सहज घेऊन जाता येणारे बॅरिकेड्स आता एकाच ठिकाणी कायम राहतील अशी व्यवस्था केली जात आहे. हे बॅरिकेड्स एकाच ठिकाणी कायमस्वरुपी रोवले जात आहेत. बॅरिकेड्स जागेवरून हलवता येऊ नये म्हणून वेल्डिंग केली जात आहे. त्याद्वारे एक प्रकारे सीमारेषाच तयार करण्यात आली आहे. आंदोलक या सीमारेषेच्या पुढे येऊ नये म्हणून हा बंदोबस्त केला जात आहे.
बंदोबस्त वाढवला
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर ही कार्यवाही होत आहे. भविष्यात जर आंदोलन झालं तर आंदोलकांना बॅरिकेड्स पार करता येऊ नयेत. किंवा बॅरिकेड्स जागेवरून हलवता येऊ नयेत याची खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे वेल्डिंग करून हे बॅरिकेड्स मजबूत केले जात आहेत. जेणे करून जमावाला एका ठरावीक ठिकाणापर्यंत रोखता येणार आहे. दुसरीकडे जंतरमंतरवर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. पॅरामिलिट्री फोर्स, दिल्ली पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणा तैनात ठेवण्यात आल्या आहेत. त्यांच्यासमोरच हे बॅरिकेड्स पक्के करण्याचं काम सुरू आहे.
दुसरं आंदोलन सुरू
सीजेपीचं आंदोलन संपलंय. सर्व तरुण आपआपल्या शहरात पोहोचलेत. मात्र आता डाव्या संघटनांशी संबंधित विद्यार्थी जंतरमंतरवर पोहोचले आहेत. विद्यार्थी आणि आंदोलकांवरील पोलिसांची कारवाई बंद करण्याची मागणी या संघटनेने केली आहे. पोलीस आपल्या आश्वासनापासून मागे फिरल्याचा आरोप या संघटनेने केला आहे.
दीपके महाराष्ट्रात
धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा झाल्यानंतर तब्बल तीन महिन्यानंतर अभिजीत दीपके आज घरी परतले आहेत. अभिजीत दीपके छत्रपती संभाजीनगर येथील घरी आले आहेत. विमानतळावर आणि क्रांती चौकात येताच अभिजीत यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यांना ओवाळण्यात आलं. यावेळी शेकडो लोक उपस्थित होते. अभिजीत दीपके यांचा जयघोष करत होते. यावेळी अभिजीत दीपके यांनी मीडियाशी संवाद साधला. सरकारने विद्यार्थ्यांना त्रास देणं सुरूच ठेवलं तर आम्हाला परत रस्त्यावर उतरावं लागेल, असा इशारा अभिजीत दीपकेने दिला आहे.
Leave a Reply