
म्यानमारच्या किनाऱ्याजवळ बंगालच्या उपसागरात भीषण जहाज दुर्घटना घडली आहे. रोहिंग्या निर्वासितांना घेऊन जाणारे 2 जहाज बुडाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 500 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेची माहिती संयुक्त राष्ट्राच्या एजन्सीने दिली. खराब हवामानामुळे दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेनंतर आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटना आणि संयुक्त राष्ट्र निर्वासित संस्थेने एकत्र निवदेन देखील जारी केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जून्या शेवटच्या आठवड्यात 500 हून अधिक रोहिंग्या हे म्यानमारच्या पश्चिम रखाइन राज्यातून निघाले. त्यांच्या एका जहाजात 250 जण होते. तर दुसऱ्या जहाजात जवळपास 300 जण होते. दोन्ही जहाजे रखाइनहून निघाल्यानंतर काही वेळानंतर अचानक बेपत्ता झाले. दोन्ही जहाज हे बंगालच्या उपसागरात म्यानमारच्या इरावदी किनाऱ्याजवळ बुडाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन्ही जहाजातील 500 हून अधिक जण बुडाल्याची माहिती मिळत आहे.
या दुर्घटनेत नेमकं किती जणांचा मृत्यू झाला, याचा अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही. परंतु जहाजामधील बेपत्ता लोकांविषयी कोणतीही माहिती हाती आलेली नाही. त्यांचे मृतदेह देखील हाती लागलेले नाहीत. ते जिवंत असल्याचीही कोणती माहिती हाती आलेली नाही. ऐन पावसाळ्यात बंगालचा उपसागर खवळलेला असतो. त्यामुळे दुर्घटना घडण्याच्या शक्यता अधिक असते, त्यामुळे दोन जहाज बुडाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार, म्यानमारमध्ये हिंसाचाराच्या घटना सुरूच आहे. बांगलादेशतही निर्वासितांचीही संख्या अधिक आहे. हिंसाचारामुळे रोहिंग्या निर्वासित जीव धोक्यात घालून समुद्रातून प्रवास करत आहे. काही रोहिंग्या बांगलादेशातील देखील आहेत. सर्व रोहिंग्यांना मलेशिया, इंडोनेशिया आणि थायलंडमध्ये जाऊन आयुष्याची नवीन सुरुवात करायची होती. परंतु दुसऱ्या देशात जाण्याआधी रोहिंग्याचं जहाज बुडालं. याआधी देखील अनेक दुर्घटना घडल्या आहेत. कोणत्याही सुरक्षेशिवाय जहाजातून प्रवास केल्याने अनेक रोहिंग्यांना जीव गमवावा लागला आहे. आता आणखी एक दुर्घटना घडल्याने पुन्हा रोहिंग्या निर्वासितांचा स्थलांतराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Leave a Reply