
राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. जवळपास संपूर्ण राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागला. ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह आलेल्या या पावसामुळे तिघांचा मृत्यू झाल्याची घटनाही घडली आहे. आज राज्याच्या कोणत्या भागात पावसाने हजेरी लावली ते जाणून घेऊयात.
भांडूपमध्ये पावसाच्या सरी
उकाड्याने हैराण परेशान झालेले भांडुपकर सुखावले आहेत. भांडूपमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावल्यामुळे लोकांची कामावरून घरी जाताना चांगलीच तारांबळ उडाली आहे. वातावरणात बदल झाला असून हवेत गारवा आणि ढगाळ वातावरण दिसून येत आहे.
यवतमाळमध्ये तिघांचा मृत्यू
यवतमाळ जिल्ह्यात आज विजाच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यामध्ये कळंब आणि उमरखेड येथील तिघांचा वीज पडल्याने मृत्यू झाला तर दोघेजण गंभीर रित्या जखमी झाले आहे. कळंब तालुक्यातील उमरी येथील भीमराव रामभाऊ काटकर, निखिल भोयर तर उमरखेडच्या कुरली येथील महेश आडे या तिघांचा वीज पडल्याने मृत्यू झाला आहे.
भंडाऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी मान्सूनची हजेरी
हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज सलग दुसऱ्या दिवशी भंडाऱ्यात मान्सूनचा पाऊस बरसला. विजांच्या प्रचंड कडकडाटासह भंडारा शहरासह ग्रामीण भागातही जोरदार पाऊस पडला. मागील काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेतील शेतकरी या पावसामुळं काही प्रमाणात का होईना सुखावला आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या या जोरदार पावसानं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
पनवेलमध्ये पावसाची दमदार हजेरी
पनवेलसह महामार्ग परिसरात पावसाने अखेर दमदार हजेरी लावली आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण आणि वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र मागील तासाभरापासून सुरुवात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सिन्नर व परिसरात पावसाचे दमदार आगमन
गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने आज सिन्नर शहर आणि ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या या मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली, तर शहरातील सखल भागांत पाणी साचले होते. या पहिल्याच मोठ्या पावसामुळे हवेत सुखद गारवा निर्माण झाला असून, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नाशिकमध्येही पावसाच्या सरी
आज नाशिक शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत मान्सूनचे दमदार आगमन झाले. अचानक झालेल्या या जोरदार पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मान्सून लांबल्याने नाशिककर गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत होते. अखेर आज नाशिक शहरात पावसाने हजेरी लावली आहे.
वाशिम : मानोरा, मंगरूळपीर, रिसोड तालुक्यात पावसाची हजेरी,
वाशिम जिल्ह्यातील मानोरा, मंगरुळपीर आणि रिसोड तालुक्यात अनेक ठिकाणी आज मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी पेरणीसाठी आवश्यक असलेल्या दमदार पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. या पावसामुळं लागवड केलेल्या हळद पिकाला मोठा फायदा होणार आहे.
जालना : अंबडमध्ये बरसल्या पावसाच्या सरी
अंबड शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी पहायला मिळाली. वडीगोद्री, अंतरवाली सराटी, अंकुशनगर आणि भांबेरीसह आसपासच्या परिसरात चांगला पाऊस पडला. आपेगाव, रेणापूरी गावात शेतामध्ये पाणी साचल्याच पाहायला मिळालं.
छत्रपती संभाजीनगरच्या भराडी शिवारात जोरदार पाऊस
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात आज जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. भराडी शिवारात गेल्या एका तासापासून मुसळधार पाऊस सुरू असून शेतांमध्ये पाणी साचल्याचे चित्र आहे. नाले-ओढ्यांनाही पाणी आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळाला असून खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना आता वेग येण्याची शक्यता आहे.
वसई विरार
वसई-विरार शहरात मान्सूनने जोरदार हजेरी लावत पावसाला दमदार सुरुवात झाली आहे. आज दुपारपासूनच शहराच्या विविध भागांत पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली असून आकाशात दाट ढगांचे साम्राज्य पसरले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार अखेर पावसाने हजेरी लावली असून उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पावसामुळे रस्ते ओलेचिंब झाले असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
रायगड जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी
रायगड जिल्ह्यात आज सकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांसह शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने उष्णतेचा त्रास वाढला होता. मात्र आज सकाळपासून माणगाव, लोणेरे, इंदापूर, रोहा तसेच जिल्ह्यातील विविध भागांमध्ये पावसाने दमदार सुरुवात केली.
कल्याण डोंबिवली परिसरात पावसाचा जोर वाढला
सकाळपासून कल्याण डोंबिवली परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. अधून मधून पावसाचा जोर वाढत असल्याने नागरिकांची तारांबळ सुरू आहे. काही ठिकाणी झाडे पडण्याची घटना तर काही ठिकाणी महावितरणचे खांब पडल्याने बत्ती गुल झाली आहे.
सातारा जिल्ह्यात पश्चिम भागासह ग्रामीण भागात पावसाचे आगमन
सातारा जिल्ह्यात पावसाचे मागील दोन दिवसापासून आगमन झाले असून आज सकाळपासूनच पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. हा पाऊस शेतीच्या मशागतीसाठी उपयुक्त समजला जात असून पूर्वेकडील मान खटाव परिसरात पाणीटंचाई कमी होण्यास मदत होणार आहे.
नवी मुबंईत रिमझिम पाऊस
नवी मुबंईत रिमझिम पावसाला सुरवात झाली आहे. नवी मुंबईतील जुईनगर, बेलापूर, सानपाडा, पनवेल परिसरात रिमझिम पाऊस बरसत आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची देखील तारांबळ उडालेली आहे. नवी मुंबईत सर्वत्र ढगाळ वातावरण देखील आपणास पाहायला मिळत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस
अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस बरसला. मान्सूनच्या आगमनाने समाधानाच वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले असून खेत शिवारात पाणी साचले आहे. राहाता , संगमनेर , शिर्डी , अकोले परिसरात दमदार पावसाची हजेरी पहायला मिळाली.
Leave a Reply