
ईशान किशनने अखेर जवळपास १३ वर्षांपासूनची प्रतीक्षा पूर्ण केली. पूर्व विभागाच्या संघाने अंतिम सामन्यात दक्षिण विभागाला हरवून दुलीप ट्रॉफी जिंकली. अंतिम सामना अनिर्णित राहिला असला तरी, पूर्व विभागाला त्यांच्या पहिल्या डावाच्या आधारावर विजेता घोषित करण्यात आले. या विजयात कर्णधार ईशान किशनने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने केवळ बॅटने दमदार खेळीच केली नाही, तर कर्णधार म्हणून महत्त्वाच्या क्षणी योग्य निर्णय घेऊन विजय मिळवून दिला.
पूर्व विभागाने दक्षिण विभागाला हरवून दुलीप ट्रॉफी जिंकली. यापूर्वी, ईशानने २०२५ मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीही जिंकली होती. त्यावेळी तो झारखंडचा कर्णधार होता आणि झारखंडने प्रथमच हे विजेतेपद पटकावले होते. पूर्व विभागाचा संघ गेल्या १३ वर्षांपासून दुलीप ट्रॉफीची वाट पाहत होता आता त्याला यश मिळाले आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातही इशानला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळाला होता आणि दोन्ही स्पर्धा वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये खेळल्या जात असूनही, त्याने यावेळी पुन्हा हा पुरस्कार पटकावला.
इशान किशनने आतापर्यंत १६ प्रथम-श्रेणी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले असून, त्यापैकी आठ सामने जिंकले आहेत आणि आठ अनिर्णित राहिले आहेत. याचा अर्थ, त्याच्या कर्णधारपदाखाली संघाने एकही सामना गमावलेला नाही. ही स्वतःच एक अविश्वसनीय कामगिरी आहे. दरम्यान, दक्षिण विभागाचा कर्णधार तिलक वर्माने अंतिम सामन्यात ९९ धावांची खेळी केली, पण ती सामन्यासाठी अपुरी ठरली आणि संघ पराभूत झाला.
अंतिम सामन्यात, प्रथम फलंदाजी करताना पूर्व विभागाने आपल्या पहिल्या डावात ७०८ धावांचा डोंगर उभा केला, ज्यात कर्णधार इशान किशनच्या २७० धावांचा समावेश होता. यानंतर, जेव्हा दक्षिण विभाग फलंदाजीसाठी आला, तेव्हा संपूर्ण संघ ३३६ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. इशानने साऊथ झोनवर फॉलो-ऑन लादून त्यांना पुन्हा फलंदाजी करण्यास भाग पाडले असते, पण त्याने फलंदाजी करणे निवडले. ईस्ट झोनने आपल्या दुसऱ्या डावात सात गडी गमावून ३८८ धावा केल्या, तेव्हा सामना अनिर्णित घोषित करण्यात आला आणि पहिल्या डावातील आघाडीच्या आधारावर ईस्ट झोन विजेता ठरला.
Leave a Reply