
राज्यात सध्या मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ परिसरात वालधूनी नदीला मोठा पूर आला आहे. नदीपात्रातून हजारो क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वालधूनी नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्यामुळे प्राचीन अंबरनाथ शिवमंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता बंद करण्यात आला आहे. प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांना नदीकाठी जाण्याचे टाळण्याचे आवाहन केले आहे. ही नदी अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराच्या बाहेरून वाहत असून नदीचं पाणी मंदिराकडे जाणाऱ्या पुलांच्या वरून गेल्यामुळे शिवमंदिराकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे.
स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलीस घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हवामान विभागाने पुढील काही तासांत आणखी मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
Leave a Reply