
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील युवा खेळाडूंशी संवाद साधत क्रीडा क्षेत्रातील भारताच्या भविष्याबाबत महत्त्वाचे विचार मांडले. ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे कमी प्रतिनिधित्व हे एक मोठे आव्हान असल्याचे त्यांनी नमूद केले. खेळामुळे केवळ खेळाडूंचीच नव्हे, तर त्यांच्या परिवाराची प्रतिष्ठा वाढते आणि गावाला तसेच शहराला एक वेगळी ओळख मिळते, असे मोदी म्हणाले. देशासाठी खेळणे म्हणजे देशाचा गौरव वाढवणे आहे, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. ऑलिम्पिकमध्ये अधिक पदके जिंकण्यासाठी स्पर्धेत सहभाग वाढवणे आवश्यक असल्याचे मोदींनी सांगितले.
ऑलिम्पिकमधील अर्ध्याहून अधिक खेळांमध्ये भारताचे संघ नसतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. 2036 च्या ऑलिम्पिकसाठी आतापासूनच खेळाडू तयार करायचे आहेत, असे लक्ष्य त्यांनी ठेवले आहे. यासाठी टॅलेंट हंटची घोषणा करण्यात आली आहे, जेणेकरून ऑलिम्पिकच्या सर्व खेळांमध्ये भारताचे खेळाडू खेळू शकतील. क्रीडा क्षेत्रासाठी जी मदत लागेल ती सरकार देण्यास तयार असल्याचे आश्वासन मोदींनी दिले. स्पोर्ट्स इकोसिस्टिम तयार करण्यासाठी सरकार गंभीर असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
Leave a Reply