
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमराठी रिक्षा, टॅक्सी, ओला, उबर, रॅपिडो चालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ दिली असली तरी, मराठी शिकणे अनिवार्यच राहील, असा ठाम पवित्रा आमदार प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री हे महायुतीचे सर्वोच्च नेते असल्याने त्यांचा निर्णय बंधनकारक असला तरी, महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषा येणे आवश्यक असल्याचे सरनाईक म्हणाले.
शासन निर्णयानुसार, महाराष्ट्रात प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी जुजबी मराठी बोलणे आवश्यक आहे. यापूर्वी १०५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. नंतर एक महिन्याची नोटीस आणि तीन महिन्यांचा कालावधी देण्यात येणार होता. मात्र, आता मुख्यमंत्र्यांनी एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीने “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा अभियान” राबवले जात आहे. या अभियानाअंतर्गत १८०० शिक्षक आणि १८० वर्ग सुरू आहेत. या मुदतवाढीचा फायदा घेऊन अमराठी चालकांनी मराठी शिकावे, अन्यथा वर्षभरानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात रोजगार मिळवण्यासाठी मराठी अस्मितेचे पालन करणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
Leave a Reply