
ठाकरे गटाच्या मुंबई महापालिकेतील 16 नगरसेवकांचं पद धोक्यात असल्याचं सांगितलं जात आहे. या 16 नगरसेवकांच्या जातप्रमाणपत्रांना कोर्टात आव्हान देण्यात आलेलं आहे. त्यामुळे या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी वेगळाच आणि धक्कादायक दावा केला आहे. भाजपच्या 27 नगरसेवकांचे आणि शिंदे गटाच्या 9 नगरसेवकांचे जात प्रमाणपत्र वादग्रस्त असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. राऊत मीडियाशी संवाद साधत होते.
भाजपच्या 27 नगरसेवकांचं जात प्रमाणपत्र वादग्रस्त आहे. शिंदे गटाच्या 9 नगरसेवकांचं जात प्रमाणपत्र वादग्रस्त. असं सांगतानाच विशाखा राऊत यांच्यासमोर दुसऱ्या नंबरवर असलेल्या व्यक्तीचं जात प्रमाणपत्रही वादग्रस्त आहे. या व्यक्तीने कुडाळ किंवा कोकणातून जातप्रमाणपत्र आणलंय. त्याची सखोल चौकशी केल्यास त्या व्यक्तीचं जात प्रमाणपत्रही रद्द होईल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
फडणवीस, शिंदेंचे फोन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: जात पडताळणी अधिकाऱ्यांना फोन करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही फोन करत आहेत. याचं वाचवा आणि याचं रद्द करा, असं सांगण्यासाठी मुख्यमंत्री फोन करत आहेत. कुणाचं जात प्रमाणपत्र वैध आणि कुणाचं नाही? हे सांगण्यासाठी मिंधे फोन करत आहेत. राज्यात सध्या या लेव्हलला राजकारण सुरू आहे, अशी टीका राऊत यांनी केली.
तुम्ही मेलंच पाहिजे
शिवसेना भवनावर शिवाजी महाराजांसोबत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असल्याबद्दल वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आक्षेप घेतला आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कोण विधीज्ञ? या देशात एकच विधीज्ञ होते. पहिले होते मोतीलाल नेहरू. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर नाथ पै. असे काही विधीज्ञ आहेत का? किल्ला कोर्टाबाहेर विधीज्ञांची फौज असते. कुणी जर फोटोसाठी उपोषणाची धमकी देत असेल तर उपोषण करून तुम्ही मेले पाहिजे. तुम्ही कलंक आहात. तुम्ही या धरतीला भार आहात. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाला स्वाभिमान दिला. त्यांच्या विषयी घृणा वाटत असेल तर फडणवीस यांनी त्यांच्या इच्छा मरणाचा अर्ज मान्य करावा. ते शिवसेना भवन आहे. तिथे शिवाजी महाराजांचा सन्मान होत असतो. जय शिवाजी आणि जय भवानी ही घोषणा शिवसेनेने आणली आहे, असं राऊत म्हणाले.
हिंदू खतरे मे नाही
यावेळी त्यांनी हिंदूंना कोणताही धोका नसल्याचं म्हटलं आहे. हिंदू खतरे में नाही. हिंदू सुरक्षित आहेत. कोण म्हणाले हिंदूंना खतरा आहे? मोदी आहेत ना? प्रति हिंदुहृदयसम्राट आहेत ना ते? महाराष्ट्रात काही चिल्लर हिंदू हृदयसम्राट आहेत. ते सांगतात म्हणून हिंदू खतरे में नाही येत. हिंदुंवर जेव्हा जेव्हा संकट आलं, तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने बलिदान दिलं. आमच्यावर खटले आहेत. तुमच्यावर कोणते खटले आहेत? हिंदू सुरक्षित आहे. काल पुण्यात रस्त्यावर उतरले ते हिंदूत्ववादी आहेत. त्यांना हिंदुत्वाचं रक्षण करायचं आहे. त्यामुळेच ते रस्त्यावर उतरले आहेत. मिंधे आणि त्यांच्या मंत्र्यांनी समजून घ्यावं, अशी टीका त्यांनी केली.
Leave a Reply