
मुंबई- गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला होणाऱ्या विलंबावरून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी खंत व्यक्त केली आहे. खरं तर हे काम 2016 पर्यंतच पूर्ण होणं अपेक्षित होतं. परंतु गेल्या 15 वर्षांमध्ये या महामार्गाचं काम केवळ 94 टक्केच झालं आहे. त्यामुळे महामार्गाचं काम पूर्ण झाल्यावर मी या महामार्गाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही, असं गडकरी यांनी म्हटलं होतं. ते पणजी येथील सहा पदरी उन्नत मार्गाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. दरम्यान यावर आता मंत्री नितेश राणे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.शेवटी तो त्यांचा निर्णय आहे, आज जो रस्ता तयार झालेला आहे हा त्यांच्यामुळेच झाला आहे. तो अतिशय चांगला आणि मजबूत आहे, म्हणून गडकरी साहेबांना आम्ही आग्रह करू आम्ही पाहिजे तर त्यांना दिल्लीला घ्यायला जाऊ पण त्यांच्याच उपस्थितीतच हायवेचे उद्घाटन होईल, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान मुंबईतून गणेश भक्तांना कोकणात जाण्यासाठी दर वर्षी नितेश राणे यांच्या पुढाकारातून मोदी एक्स्प्रेस ट्रेनचं नियोजन करण्यात येतं. यावर देखील यावेळी नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या 14 वर्षांपासून कोकणाकडे जाणाऱ्या आमच्या कोकणवासीयांसाठी आम्ही पहिले काही वर्ष बसेसचे आयोजन केलं आणि आता मोदी एक्सप्रेस ही आम्ही कोकणाच्या दिशेने दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने पाठवत असतो. वाजत गाजत भजन बोलत आमचे कोकणवासी जे मुंबई आणि आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये राहतात त्यांनाही मोफत सेवा आम्ही गेल्या 14 वर्षांपासून देत आहोत. 11 तारीख आणि 13 तारीख असे दोन दिवस ही मोदी एक्सप्रेस निघणार आहे, यामध्ये जेवणापासून पिण्याच्या पाण्यापर्यंत सगळी सुविधा आम्ही दरवर्षीप्रमाणे देतो.
ज्या कोकणवासीयांमुळे जे आमचं अस्तित्व आहे, आमची ताकद आहे, कोकण हा आमचा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे तिकडच्या लोकांचा विकास करणे त्यांची सेवा करणे, हा हेतू नजरेसमोर ठेवून आम्ही मोदी एक्सप्रेस दरवर्षी सोडतो आहोत, असंही यावेळी नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
Leave a Reply