
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील संघर्षाबाबत खुलासा केला आहे. सुरुवातीच्या दिवसांत आपल्या शरीरयष्टीमुळे लोकांकडून टीका आणि टोमणे सहन करावे लागत असल्याचे तिने सांगितले.
अनेकजण तिला पाहून, हिला काही खायला द्या, ती खूपच बारीक आहे, अशी टिप्पणी करत असत, असे माधुरीने एका मुलाखतीत सांगितले. सध्या माधुरी तिच्या नव्या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. महिलांना तिच्या दिसण्यावरून, कपड्यांवरून आणि वैयक्तिक निवडींवरून कसे जज केले जाते, हा विषय तिने यावेळी मांडला.
तिने सांगितले की, चित्रपटसृष्टीतही कलाकारांना त्यांच्या रूप, शरीरयष्टी आणि व्यक्तिमत्त्वावरून सतत मोजले जाते. सार्वजनिक जीवनात असलेल्या व्यक्तींविषयी लोक नेहमीच मतप्रदर्शन करत असतात. वजन वाढले तरी टीका होते आणि वजन कमी असले तरीही लोक बोलतात. भारतात एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर तिच्या दिसण्यावर टिप्पणी करणे ही सामान्य बाब असल्याचेही तिने नमूद केले.
तिच्या मते, 1980 च्या दशकात या प्रकारच्या टीकेला सामोरे जाणे तुलनेने सोपे होते, कारण त्यावेळी सोशल मीडिया आणि ट्रोलिंगचे आजसारखे प्रचंड जाळे नव्हते. त्यामुळे लोक काय बोलतात हे प्रत्येक वेळी समोर येत नसे. मात्र आजच्या काळात सोशल मीडियावर अनेकजण आपली ओळख लपवून कोणतीही टिप्पणी करतात, असं तिने सांगितलं.
या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी स्वतःवर प्रेम करणे हा सर्वोत्तम उपाय असल्याचे माधुरीने सांगितले. आपले ध्येय, आवड आणि आनंद देणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. इतरांच्या मतांना जास्त महत्त्व न देता स्वतःवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे असा संदेश तिने दिला.




Leave a Reply