
रुपाली चाकणकर यांनी बदनामीची तक्रार केल्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिपाली सय्यद, ठोंबरे, अंधारे आणि संगीता तिवारींसह 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोंदुबाबा अशोक खरातसोबतचे सार्वजनिक कार्यक्रमाचे व्हिडीओ वापरून आरोप केल्याची तक्रार चाकणकरांनी केली आहे. सोशल मीडियातून माझ्यावर अश्लील, अपमानास्पद आणि घाणेरडी शेरेबाजी करण्यात आली, असं त्यांनी तक्रारीत म्हटलंय. यावर आता दिपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाल्या दिपाली सय्यद?
“मला या गोष्टीचा प्रचंड राग आला आहे. मी आतापर्यंत खूप आदरपूर्वक बोलले आहे. पण आता काम करत असताना तुम्ही मला मेंटल टॉर्चर करत आहात. मी एक कलाकार म्हणून काम करतेय. तुम्ही आधीच दिल्लीमध्ये केस फाइल केली होती. त्याला आम्ही उत्तर देत होतो. तुम्ही आमच्यावर 25 कोटींचा दावा केला. आम्ही त्यांच्यावर 500 कोटींचा दावा केला. तिथे केस सुरू असताना तुम्ही मुंबईत येता आणि दुसरा टीझर लाँच झाल्यानंतर तुम्ही मुंबईत एफआयआर करता,” असं त्या म्हणाल्या.
“तुम्ही म्हणताय की मी सोशल मीडियावर अश्लील पोस्ट केले, मी नको ते बोलले. मी माझ्या कुठल्याही सोशल मीडियावर काहीही अश्लील पोस्ट केलेली नाही. मी माझं काम केलंय. आमचं टीझर पोस्ट केलंय. तेवढंच केलंय. तुम्ही माझी बदनामी करत आहात. तुम्ही मला टॉर्चर करत आहात, जेणेकरून मी काम करू नये, माझं फिल्म येऊ नये. माझ्यासाठी हे माझं काम आहे. हा माझा उदरनिर्वाह आहे”, अशा शब्दांत त्या व्यक्त झाल्या.
याविषयी त्या पुढे म्हणाल्या, “मला आता अजितदादांची आठवण येत आहे. ते असते तर त्यांनी असं करू दिलं नसतं. त्यांच्याकडे काय पुरावा केला, मी कुठे त्यांची बदनामी केली? तुम्ही म्हणत आहात की.. या या.. आम्ही तुमच्या नावाचा वापर केलाय का? तुम्ही काही न विचारता थेट वार करत आहात. हा वार चुकीचा आहे. तुम्ही माजी महिला अध्यक्ष होता, तेव्हा तुम्ही काही करायला हवं होतं, ते तुम्ही आता करत आहात, याचं मला दु:ख वाटतंय.”
रुपाली चाकणकरांच्या आरोपांवर दिपाली सय्यद यांनी स्पष्ट केलं की, “हा एक चित्रपट आहे, एक विषय आहे. त्यात वेगवेगळी पात्रं आहेत. रुपाली चाकणकर हे त्यातलं एक कॅरेक्टर आहे. ही तुमची बायोग्राफी नाहीये. त्यात इतरही बरेच जण आहेत. बाकीचे कोणी का बोलत आहेत? मी माझ्या फिल्मचं प्रमोशन करतेय. मी फक्त चित्रपटाबद्दल बोलले आहे. याच्यापलीकडे कुठलंही अश्लील वक्तव्य केलेलं नाही.”
“या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली आहे आणि आता पोस्ट प्रॉडक्शनचं काम सुरू आहे. ठरलेल्या तारखेलाच हा चित्रपट थिएटरमध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. पण आम्हाला काम करू न देणं, आमच्या पोटावर लाथ मारणं.. हे चुकीचं आहे. मी तर म्हणतेय की त्यांनी माझ्या बाजूला बसून आधी हा चित्रपट पहावा. हा फक्त अंधश्रद्धा आणि श्रद्धेवरचा आहे. आपल्या महाराष्ट्रात कितीतरी भोंदूबाबा आले आहेत, त्यापैकीच हा एक विषय आहे,” असं त्यांनी चित्रपटाविषयी सांगितलं आहे.
Leave a Reply