
गिरीश गायकवाड : मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरावाली सरदाटीतील उपोषणाचा अकरावा दिवस आहे. गेल्या काही दिवसांत सरकारच्या प्रतिनिधींनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. त्यानंतरही मराठा आरक्षणावर तोडगा निघालेला नाही. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊन उपोषण करणार असल्याचे जाहीर केले. मनोज जरांगे पाटील यांच्या इशाऱ्यानंतर सरकारी पातळीवर मराठा आरक्षणासाठी हालचालींना वेग आला आहे. मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी मध्यरात्री बैठक झाली. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्यावर महत्वाची चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीला महायुतीमधील दिग्गज नेते उपस्थित होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी काल रात्री उशिरापर्यंत मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाली. वर्षा बंगल्यावरील ही बैठक रात्री दोन वाजता संपली. तसेच मराठा समाजाला न्याय देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही, हा मुद्दा प्रामुख्याने चर्चेत होता. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री उदय सामंत, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रविंद्र चव्हाण, प्रसाद लाड हे नेते होते उपस्थित होते. जरांगे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्व प्राप्त झालं होतं. या बैठकीत नेमकी काय झाली, याविषयी अधिकृत माहिती समोर येऊ शकलेली नाही.
Leave a Reply