
90च्या दशकाची हरिद्वारच्या गल्लीबोळांची पार्श्वभूमी आणि साध्या पण मनाला भिडणाऱ्या कथेमुळे ‘दम लगा के हईशा’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात खास स्थान राखून आहे. जवळपास दशकभरानंतर हा चित्रपट पुन्हा एकदा OTT प्लॅटफॉर्मवर ट्रेंड होत असून प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती मिळवत आहे.
आजच्या डिजिटल युगात जुने चित्रपटही पुन्हा चर्चेत येतात. सध्या Netflix वर हा चित्रपट टॉप 10 ट्रेंडिंग लिस्टमध्ये झळकत आहे. रिलीज होऊन सुमारे 11 वर्षे उलटूनही या चित्रपटाची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही. प्रेक्षक फक्त हा चित्रपट पाहत नाहीत तर सोशल मीडियावर त्यातील सीन आणि डायलॉग्सही पुन्हा व्हायरल होत आहेत.
कलाकार आणि दिग्दर्शन
या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहेत. दिग्दर्शक शरत कटारिया यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आपल्या साध्या आणि वास्तववादी कथेमुळे प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
चित्रपटाची कथा हरिद्वारमध्ये घडते. प्रेम (आयुष्मान खुराना) हा कमी शिक्षित मुलगा असतो, जो आपल्या वडिलांच्या भीतीमुळे स्वतःच्या इच्छेविरुद्ध संध्या (भूमी पेडणेकर)शी लग्न करतो. प्रेमला तिच्या शरीरयष्टीबद्दल संकोच वाटतो आणि तो तिला सार्वजनिक ठिकाणी स्वीकारण्यास कचरतो. दुसरीकडे, संध्या ही आत्मसन्मान जपणारी मुलगी आहे. जी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची किंमत वजनावर मोजत नाही. यामुळे दोघांमध्ये सतत वाद होतात आणि नातं ताणतंणावात जातं.
कथेतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘दम लगाके हईशा’ ही रेस. या स्पर्धेत पतीने आपल्या पत्नीला पाठीवर उचलून धावायचे असते. हीच रेस त्यांच्या नात्यातील टर्निंग पॉइंट ठरते. या प्रसंगातून त्यांच्या नात्याला नवा अर्थ मिळतो आणि प्रेक्षकांनाही भावनिकरित्या जोडून ठेवतो.
केवळ कॉमेडी नाही, तर भावनिक प्रवास
हा चित्रपट फक्त मनोरंजन करणारा नाही तर एका संघर्षमय प्रवासाची कहाणी आहे. एका बाजूला स्वतःच्या अपयशांशी झगडणारा तरुण तर दुसऱ्या बाजूला आत्मसन्मान जपणारी स्त्री या दोन व्यक्तिरेखांमधील भावनिक संघर्ष प्रेक्षकांना आपलासा वाटतो. ‘दम लगा के हईशा’ हा चित्रपट आजही OTT वर पुन्हा रिलीज झाल्यानंतर त्याने ट्रेंडिंग लिस्टमध्ये चौथ्या क्रमांकावर स्थान मिळवले होते.
Leave a Reply