
मराठी चित्रपटसृष्टीत खलनायक हे पात्र म्हटलं की सर्वात पहिला डोळ्यासमोर ज्यांचा चेहरा उभा राहतो ते म्हणजे अभिनेते निळू फुले. मात्र, पडद्यावरचा हा खलनायक खऱ्या आयुष्यात किती संवेदनशील माणूस होता याच उदाहरण देणारा मन हेलावून टाकणारा किस्सा आज आपण जाणून घेणार आहेत. निळू फुले यांचे समकालीन व लोकप्रिय अभिनेते राम नगरकर यांनी आपल्या रामनगरी या आत्मचरित्रात निळू फुले आणि त्याच्या आईसोबत घडलेला एक किस्सा सांगितला आहे.
अभियासोबतच निळू भाऊ सामाजिक कार्यात मोठा सहभाग घेत होते. ते राष्ट्रीय सेवा दलाचे सदस्य होते. राष्ट्रीय सेवा दला तर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या उपक्रमांमध्ये ते हिरीरीने भाग घ्यायचे. त्याकाळी राम नगरकर आपल्या नव्या दुकानाच्या उदघाटनासाठी पुण्यात गेले होते, पुण्यात ते निळू भाऊंच्या घरी वस्तीला होते. त्या काळात महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता. सेवादलाने पुण्यातून धान्य गोळा करून ते दुष्काळग्रस्त भागात वाटण्याचा उपक्रम हाती घेतला होता. निळू भाऊंनी त्यासाठी विशेष पुढाकार घेतला होता. त्यांच्या पुण्याच्या घरी धान्याची जवळ जवळ ५ पोती जमा झाला होती.
घरात धान्य असूनही वापरण्यास नकार
त्या काळात राम नगरकर निळूभाऊंच्या घरी राहायला, जेवायला होते. निळूभाऊ त्यांच्याकडून काहीही पैसे घेत नसत. एक दिवस निळू भाऊंच्या आईसमोर समस्या उभी राहिली. घरात १२ -१३ लोकांचं कुटुंब आणि घरात अन्नाचा दाणा खायला उरला नव्हता. जवळचे पैसेदेखील संपले होते. एके दिवशी निळू भाऊ आणि नगरकर कुठेतरी बाहेर जायला निघाले होते. तेव्हा निळू भाऊंच्या आईने निळू भाऊंना आत बोलावून म्हटंल, ‘निळू थोडे पैसे आहेत का? त्यावर निळू भाऊ म्हणाले, ‘सगळा पगार तुलाच तर देतो, आता पैसे कुठून आणू? आई म्हणाली , ‘घरात अन्नाचा दाना नाही आहे, काय करू बोल? शेजाऱ्यांकडे मागून बघ’, निळू भाऊ म्हणाले, आधीच शेजाऱ्याकडून घेतलेलं परत दिलं नाही आहे, आता पुन्हा मागितलं तर कोण देणार…
आईच्या या उत्तरावर निळू भाऊ म्हणाले ‘तू तुझं बघ, मी आता राम सोबत बाहेर जातोय’ असं सांगत निळू भाऊ घराच्या बाहेर आले, राम नगरकर हा आई मुलाचा संवाद घराबाहेर उभे राहून ऐकत होते. दोघे बाहेर जायला निघणारच इतक्यात आईने पुन्हा आवाज दिला, निळू भाऊ मागे वळून म्हणाले,’काय आहे? मी बोललो ना माझ्याकडे पैसे नाहीत. माऊलीला साहजिकच घरातल्या धान्याच्या पोत्यांची आठवण आली. त्यावर आई म्हणाली , ‘बरं एक सांग हे धान्याच्या गोण्या कधी जाणार आहेत ? ‘४ ५ दिवस लागतील पण तू का विचारतेस?’ असे निळू भाऊ म्हणाले. ‘२ ४ दिवसांनी पाठवणार ना… मग मी आज यातून पायलीभर धान्य घेऊ का? दोन दिवसांनी पैसे आल्यावर त्यात ते परत टाकूया.’ आईचं हे वाक्य ऐकताच निळू भाऊ भडकले आणि म्हणाले,’ते लोकांचे आहेत, घरातले सगळे भुकेने मेले तरी चालतील पण या धान्याला हात लावायचा नाही.’ असं बोलून ते बाहेर जायला निघाले.
नगरकरांनी दिले पैसे
हा प्रकार ऐकून राम नगरकरांना पश्चाताप झाला, एकतर या घरात पैशाची, अन्नाची तंगी आहे आणि त्यात खिशात हजार रुपये असताना देखील मी इतके दिवस मी या घरात फुकटच बसून खात होतो. निळू भाऊंनी देखील त्यांच्या परिस्थितिची वाच्यता त्यांच्यासमोर कधी केली नाही. नगरकरांना आपली लाज वाटू लागली. निळूभाऊ घराबाहेर आले आणि असं दाखवू लागले की आत काही घडलंच नाही.
नगरकरांनी आपल्याजवळचे पैसे निळू भाऊंच्या हातात ठेवले. निळू भाऊंनी ते घेण्यास नकार दिला, त्यावर नगरकर भडकले व म्हणॆ जर तू पैसे घेतले नाही तर आताच्या आता हे घर सोडून निघून जाईन, खूप हट्ट केल्यांनतर अखेर निळू भाऊंनी नगरकरांकडून पैसे घेतले. निळूभाऊंच्या अंगी असलेली सामाजिक कार्यातील नीतिमत्ता, प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता किती होती याचे दर्शन या घटनेतून होत. पडद्यावरचा हा खलनायक खऱ्या आयुष्यात मात्र महानायक होता असं म्हणता येईल.
Leave a Reply