
भारतीय रेल्वे ही आज देशाची जीवनवाहिनी मानली जाते. दररोज कोट्यवधी प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. आरामदायी, सुरक्षित आणि तुलनेने स्वस्त असल्यामुळे प्रवासासाठी रेल्वेला सर्वाधिक पसंती दिली जाते.
देशाच्या कानाकोपऱ्याला जोडणारे विस्तीर्ण रेल्वे जाळे आणि वेगवान सेवा यामुळे भारतीय रेल्वेचा विकास सातत्याने होत आहे. आगामी काळात बुलेट ट्रेनसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे हा प्रवास आणखी जलद होणार आहे.
रेल्वेने प्रवास करताना विविध शहरांमधील स्थानके, परिसर आणि संस्कृती अनुभवायला मिळते. मात्र, अनेकदा रेल्वेने प्रवास करूनही भारतातील पहिल्या रेल्वे स्थानकाचे नाव काय होते, हा प्रश्न अनेकांना पडतो. या प्रश्नाचे उत्तर इतिहासात दडलेले आहे.
भारतातील पहिले रेल्वे स्थानक 'बोरी बंदर' हे मुंबईमध्ये होते. याच स्थानकावरून भारताच्या रेल्वे इतिहासाला सुरुवात झाली. 16 एप्रिल 1853 रोजी बोरी बंदर येथून पहिली प्रवासी रेल्वे ठाण्याकडे रवाना झाली आणि भारतीय रेल्वेच्या नव्या युगाची सुरुवात झाली.
काळानुसार या ऐतिहासिक स्थानकाच्या नावात बदल करण्यात आले. सुरुवातीला 'बोरी बंदर' या नावाने ओळखले जाणारे स्थानक नंतर 'व्हिक्टोरिया टर्मिनस' या नावाने प्रसिद्ध झाले. स्वातंत्र्यानंतर भारतीय अस्मितेला अधोरेखित करण्यासाठी या स्थानकाचे नामांतर करून 'छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)' असे करण्यात आले. आज हे स्थानक याच नावाने जगभर ओळखले जाते.




Leave a Reply