
पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली की अनेकदा एखाद्या खास व्यक्तीसोबत घालवलेले जुने क्षण आठवतात. काळ पुढे जातो, नाती बदलतात, माणसं दूर जातात; मात्र काही आठवणी मनातून कधीच पुसल्या जात नाहीत. हिंदी चित्रपटांनी पाऊस आणि प्रेम यांचं हे अनोखं नातं अनेक सुंदर गाण्यांमधून पडद्यावर उभं केलं आहे. मात्र, असंच एक गाणं आहे, ज्याची धून कानावर पडताच जुन्या प्रेमाची हुरहूर मनात जागी होते. हे गाणं म्हणजे ‘लगी आज सावन की फिर वो झड़ी है’.
1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या यश चोप्रा यांच्या गाजलेल्या ‘चांदनी’ चित्रपटातील हे गाणं आजही प्रेक्षकांच्या मनात तितकंच ताजं आहे. श्रीदेवी आणि विनोद खन्ना यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यात पावसाचा आनंद, प्रेमाची ओढ आणि जुन्या नात्याची वेदना यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो.
पावसात भिजताना श्रीदेवींचा चुलबुला अंदाज
‘चांदनी’ चित्रपटातील या गाण्याचं चित्रीकरण अत्यंत सुंदर पद्धतीने करण्यात आलं आहे. पावसाला सुरुवात होताच श्रीदेवींचं पात्र आनंदाने पावसात भिजताना दिसतं. त्यांचा निरागस आणि चुलबुला अंदाज, आजूबाजूचं पावसाळी वातावरण आणि गाण्याची मधुर चाल यामुळे पडद्यावर एक सुंदर रोमँटिक वातावरण तयार होतं.
मात्र, या आनंदी वातावरणामागे एक भावनिक कथा दडलेली आहे. श्रीदेवींना पावसात पाहताना विनोद खन्ना यांच्या व्यक्तिरेखेला आपल्या जुन्या प्रेमाची आठवण होते. पावसात दिसणाऱ्या त्या चेहऱ्यात त्यांना भूतकाळातील नातं आणि त्याच्याशी जोडलेल्या आठवणी पुन्हा जाणवू लागतात. त्यामुळे हे गाणं केवळ पावसाचं किंवा प्रेमाचं वर्णन करणारं राहत नाही तर विरह, अपूर्ण प्रेम आणि जुन्या आठवणींची हुरहूर व्यक्त करणारं गाणं बनतं.
आजही हे गाणं ऐकताना आठवणींनी डोळे पाणवतात
या गाण्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यामध्ये पावसाचा वापर दोन वेगवेगळ्या भावनांसाठी करण्यात आला आहे. एका बाजूला पाऊस आनंद आणि रोमँटिक वातावरण निर्माण करतो तर दुसऱ्या बाजूला तो भूतकाळातील नात्याची आठवण करून देतो.
पावसाच्या प्रत्येक सरीसोबत जुन्या आठवणी मनात जाग्या होतात अशी भावना गाण्यातून प्रभावीपणे व्यक्त होते. त्यामुळेच अनेक दशकांनंतरही हे गाणं ऐकल्यावर अनेकांना आपलं पहिलं प्रेम, एखादी जुनी व्यक्ती किंवा आयुष्यातील एखादा खास क्षण आठवतो.
Leave a Reply