
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका होत आहे. या मालिकेकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. कारण यापूर्वी त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने दोन मालिका गमावल्या आहेत. आयर्लंडसारख्या दुबळ्या संघाने भारताला 0-2 ने मात दिली होती. तर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका 4-0 ने गमावली आहे. त्यामुळे आता नेतृत्व सिद्ध करण्यासाठी श्रेयस अय्यरला ही मालिका खूपच महत्त्वाची आहे. असं असताना टीम इंडिया पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. या मालिकेपूर्वी कर्णधार श्रेयस अय्यरने आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच मागे काय झालं ते विसरून पुढे जाण्याचा सल्ला त्याने आपल्या संघ सहकाऱ्यांना दिला. इतकंच काय तर कठीण टप्प्यामुळे संघ अधिक मजबूत झाल्याचं देखील त्याने सांगितलं. अपयशाचा विचार करण्यापेक्षा इंग्लंडविरुद्धच्या आव्हानात्मक दौऱ्यात बरंच काही शिकायला मिळालं असंही त्याने सांगितलं. त्याचबरोबर झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात निर्भयपणे खेळण्याचा सल्ला दिला.
इंग्लंड दौऱ्यात आम्ही बरचं काही शिकलो
झिम्बाब्वेविरुद्धच्या टी20 मालिकेपूर्वी कर्णधार श्रेयस अय्यर याने सांगितलं की, ‘इंग्लंडमध्ये आमचा काळ खडतर होता, पण त्यातून अनेक सकारात्मक गोष्टीही मिळाल्या. एक संघ म्हणून पुढे काय उभारणी करायची आहे. मैदानावर उतरल्यावर कोणत्या प्रकारची प्रसंगावधानता, जागरूकता आणि जुळवून घेण्याची क्षमता आवश्यक आहे, हे आम्हाला समजले.’ श्रेयस अय्यरने संघ सहकाऱ्यांना निर्भयपणे खेळण्याचा सल्लाही दिला. टीका किंवा अपयशाची भीती करण्याऐवजी आक्रमक मानसिकता अंगिकारण्याचं आव्हान त्याने संघाला केलं.
निर्धास्तपणे खेळा, अपयशाची चिंता करू नका
‘तुमच्या मनात भीती नसते तेव्हा स्वत:मधील सर्वोत्तम कामगिरू करून घेऊ शकता.’ असं श्रेयस अय्यरने आपल्या संघ सहकाऱ्यांना कानमंत्र दिला. ‘बाहेर लोक काय म्हणत आहेत याचा आपण फार विचार करण्याची गरज नाही. आपण वर्तमानात राहिले पाहिजे. आपण जेवढा चांगला क्रिकेट खेळू आणि एक संघ म्हणून एकत्र खेळू, तेवढे ते संघासाठी चांगले होईल.’ असंही त्याने सांगितलं. इतकंच काय तर झिम्बाब्वे दौऱ्याचं विश्लेषण करताना श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘आमच्यापैकी काही जण येथे पहिल्यांदाच खेळत आहेत, त्यामुळे आम्ही जेवढ्या लवकर जुळवून घेऊ, तेवढे चांगले निकाल आम्हाला मिळतील’
झिम्बाब्वेला कमी लेखू नका
श्रेयस अय्यरने झिम्बाब्वे दौरा वाटतो तितका सोपा नाही असं स्पष्ट सांगितलं आहे. इंग्लंडविरुद्ध येथे येऊन सरावासाठी आणि वातावरणाशी जुळवून घेण्यात खूप कमी वेळ मिळाला. पण संघ लवकरच जुळवून घेऊल, अशा विश्वासही व्यक्त केला. श्रेयस अय्यर म्हणाला की, “त्यांच्याकडे एक अप्रतिम संघ आणि चांगली खेळाडूंची फळी आहे. त्यातील काही खेळाडू आयपीएलमध्येही खेळले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे,”
Leave a Reply