
बॉलिवूडमधील वादग्रस्त आणि बेधडक अभिनेत्री राखी सावंत हिने नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत भावनिक खुलासे केले. ती म्हणाली की, लोक तिला वाइफ मटेरियल मानत नाहीत आणि त्यामुळेच तिचे वैवाहिक आयुष्य टिकू शकले नाही.
एका मुलाखतीदरम्यान राखीने सांगितले की, समाजात अजूनही पत्नी म्हणजे शांत राहणारी, नवऱ्याचे सर्व ऐकणारी आणि स्वतःची ओळख बाजूला ठेवणारी स्त्री अशी मानसिकता आहे. मी स्वतःच्या पायावर उभी आहे, स्वतः कमावते, त्यामुळे लोक मला पत्नी म्हणून स्वीकारत नाहीत असे ती म्हणाली.
राखीने तिच्या अपयशी नातेसंबंधांबद्दलही दुःख व्यक्त केले. तिला कधीच गंभीर आणि प्रामाणिक नातं मिळालं नाही असे सांगताना ती भावुक झाली. मी लोकांना हसवू शकते, रडवू शकते, पण चांगला माणूस ओळखू शकले नाही असेही तिने नमूद केले.
तिने तिच्या माजी पती आदिल खान दुर्रानी याच्याबाबतही गंभीर आरोप केले. आदिल तिला मारहाण करण्याचा प्रयत्न करत होता असा दावा करत राखी म्हणाली की ती जीव वाचवून तिथून निघून गेली. विभक्त होण्यासाठी आदिलने तिच्याकडून 3 कोटी रुपये घेतल्याचाही आरोप तिने केला.
विशेष म्हणजे, 2022 मध्ये राखीने आदिल खान दुर्रानीसोबत निकाह केला होता. लग्नासाठी तिने धर्मांतर करून ‘फातिमा’ हे नावही स्वीकारले होते. मात्र काही महिन्यांतच त्यांचे नाते तुटले आणि दोघांचा घटस्फोट झाला.




Leave a Reply