
धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्याच पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर केले आहेत. भाजप महायुतीने माजी राज्यमंत्री तसेच लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मुरुमकर यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेस महाविकास आघाडीने युवा नेते आणि जिल्हा परिषद सदस्य महेश देशमुख यांच्यावर विश्वास टाकत त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यंदा धाराशिव-लातूर-बीड या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी ज्येष्ठ विरुद्ध तरुण असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. तसेच हे दोन्ही उमेदवार उमरगा तालुक्याचेच भूमिपुत्र आहेत. त्यामुळे ही लढत संपूर्ण मराठवाड्यासाठी कमालीची चुरशीची आणि प्रतिष्ठेची बनली आहे. आज हे दोन्ही उमेदवार धाराशिवचे जिल्हाधिकारी तसेच निवडणूक निर्णय अधिकारी कीर्तीकुमार पुजार यांच्याकडे आपले नामनिर्देशनपत्र दाखल करणार आहेत. या निवडणुकीत “दीर्घ अनुभव विरुद्ध युवा निष्ठावंत” असा थेट सामना पाहायला मिळत आहे.
बसवराज पाटील यांची सहकार क्षेत्रावर मोठी पकड
माजी राज्यमंत्री असलेल्या बसवराज पाटील यांची मराठवाड्यातील सहकार क्षेत्रावर मोठी पकड आहे. मुरुम येथील विठ्ठल साई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून त्यांचा स्थानिक स्तरावर मोठा प्रभाव आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी काँग्रेसला सोडचिठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. पक्षाने आता त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा घेण्यासाठी त्यांना थेट विधानपरिषदेच्या मैदानात उतरवले आहे.
तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसने एका तरुण आणि निष्ठावंत चेहऱ्याला संधी दिली आहे. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि ओडिशाचे प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळणारे महेश देशमुख हे राहुल गांधी यांच्या कोअर टीममधील मानले जातात. धाराशिव जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य म्हणून त्यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांशी थेट संपर्क आहे. पक्षाशी असलेली एकनिष्ठता आणि तरुण कार्यकर्त्यांचे मोठे नेटवर्क ही त्यांची ताकद आहे.
संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होणाऱ्या या निवडणुकीत धाराशिव, लातूर आणि बीड या तीन जिल्ह्यांमधील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींचे नगरसेवक मतदान करतात. जरी दोन्ही उमेदवार उमरग्याचे असले, तरी या मतदारसंघात लातूर आणि बीड या दोन जिल्ह्यांचे संख्याबळ आणि तिथल्या स्थानिक नेत्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. बसवराज पाटील यांनी अलीकडेच केलेल्या पक्षांतरामुळे काँग्रेससाठी ही जागा जिंकणे प्रतिष्ठेचे बनले आहे, तर दुसरीकडे भाजपला या जागेवर आपले वर्चस्व सिद्ध करायचे आहे. त्यामुळे आता उमरग्याच्या दोन सुपुत्रांमधील या हायव्होल्टेज लढतीमध्ये मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे डोळे लागले आहेत.
Leave a Reply