
मराठी चित्रपटसृष्टीत प्रेक्षकांना सतत काहीतरी वेगळं आणि नावीन्यपूर्ण देण्याचा प्रयत्न होत असतो. याच धडपडीतून अनेक नवे प्रयोग मराठी चित्रपटांमध्ये पाहायला मिळत आहेत. ‘राजा शिवाजी’, ‘देऊळ बंद 2’, ‘तुंबाडची मंजुळा’ यांसारख्या चित्रपटांच्या यशानंतर आता आगळ्यावेगळ्या आणि धाडसी प्रयोगासह प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘घबाडकुंड’लाही उत्तम प्रतिसाद मिळतोय. धक्कादायक वळणं आणि अनपेक्षित रहस्यांनी भरलेला हा चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडतोय. ‘घबाडकुंड’मधून कल्पनेच्या पलीकडचं एक वेगळंच ‘युनिव्हर्स’ मोठ्या पडद्यावर साकारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 19 जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर 2.43 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटील यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून निर्माते डॉ. रसिक कदम यांची भक्कम साथ या प्रकल्पाला लाभली आहे. रहस्यमय आणि गूढ गोष्टींबद्दल प्रत्येकाच्या मनात एक सुप्त आकर्षण असतं. याच गूढतेचा आणि थराराचा अनुभव ‘घबाडकुंड’मधून प्रेक्षकांना मिळत आहे. या गूढ रहस्याचा उलगडा करण्यासाठी सहा जण एका धोकादायक प्रवासाला निघतात. मात्र या शोधयात्रेत त्यांच्यासमोर उभं राहतं भीती, थरार आणि अनाकलनीय घटनांचं भयावह वास्तव! ‘घबाडकुंड’मध्ये नेमकं काय दडलं आहे? आणि या अंधाऱ्या गूढतेमागचं सत्य काय आहे? अशा प्रश्नांची उत्सुकता वाढवणारी कथा, रहस्यमय वातावरण आणि अंगावर काटा आणणाऱ्या थरारक घटना यात प्रेक्षकांना पहायला मिळत आहेत.
‘घबाडकुंड’ची आतापर्यंतची कमाई-
- पहिला दिवस- 42 लाख रुपये
- दुसरा दिवस- 76 लाख रुपये
- तिसरा दिवस- 1.25 कोटी रुपये
या चित्रपटात शशांक शेंडे, संदीप पाठक, देवदत्त नागे, कुशल बद्रिके, प्राजक्ता हनमघर, स्मिता पायगुडे-अंजुटे, वैष्णवी कल्याणकर, रॉकी देशमुख, आरोही भोईर, योगेश प्रकाश तनपुरे, साहिल अनलदेवर अशी कलाकारांची फौज पहायला मिळते. ‘घबाडकुंड’च्या पहिल्या भागाला इतकं यश मिळत असताना आता मराठी युनिव्हर्सच्या दुसऱ्या अध्यायाची अधिकृत तयारी सुरू झाली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी कंपनी तब्बल 50 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा निर्माते डॉ. रसिक कदम यांनी केली.
या नव्या प्रकल्पाचे कथानक, कलाकार, तंत्रज्ञ आणि निर्मितीशी संबंधित इतर महत्त्वाच्या बाबींची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. प्रेक्षकांना यावेळी अधिक व्यापक, रोमांचकारी आणि उच्च दर्जाच्या दृश्य अनुभवाची मेजवानी मिळणार असून, मराठी चित्रपटासाठी हे एक नवं आणि ऐतिहासिक पर्व ठरणार असल्याचा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.
Leave a Reply