
गाणी ही केवळ शब्द आणि सूर नसतात. त्यातून अनेक भावना व्यक्त होतात. काही गाणी मजेशीर असतात, काही वाजताच पाय थिरकायला लागतात, तर काही इतकी वेदनादायी असतात की डोळ्यात अश्रू येतात. असंच एक ७२ वर्षे जुनं गाणं आहे, जे विरहाच्या तीव्र वेदनेतून जन्माला आलं होतं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोक अक्षरशः आनंदाने त्याच्या तालावर नाचू लागले.
या गाण्याचे बोल राजेंद्र कृष्ण यांनी लिहिले होते, तर संगीत दिग्दर्शक हेमंत कुमार यांनी त्याला सूर दिले होते. लता मंगेशकर यांच्या अप्रतिम आवाजात हे गाणं साकारले गेले. त्यांच्या गायनामुळे प्रेम, वेदना आणि विरह या भावनांना एक वेगळीच ओळख मिळाली. हे गाणं वैजयंतीमाला आणि प्रदीप कुमार यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. गाण्यात प्रिय व्यक्तीने परत यावं, अशी तळमळ व्यक्त करणारी विनवणी आहे.
१९५४ सालच्या ‘नागिन’ या चित्रपटातील हे गाणं आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन नंदलाल जसवंतलाल यांनी केले होते. वैजयंतीमाला यांनी मालाची, प्रदीप कुमार यांनी सनातनची आणि जीवन यांनी प्रबीरची भूमिका साकारली होती. दोन युद्धखोर जमातींमधील एका प्रेमळ जोडप्याभोवती ही कथा गुंफलेली आहे. चित्रपटाच्या यशात संगीताचा मोठा वाटा होता. ‘मन डोले मेरा तन डोले’, ‘जादूगर सैयाँ’ आणि ‘तेरे द्वार खडा एक जोगी’ यांसारखी गाणीही याच चित्रपटात होती.
‘मेरा दिल ये पुकारे आजा’ या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ एक चित्रपटातील गाणं राहिले नाही. २०२२ मध्ये एका मुलीने या जुन्या गाण्यावर नाचत तयार केलेला डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर मोठ्या संख्येने लोकांनी याच चालीवर व्हिडिओ बनवले आणि त्यावर नाचायला सुरुवात केली. ‘मेरा दिल ये पुकारे आजा, मेरे गम के सहारे आजा’ हे बोल आजही ऐकल्यावर भूतकाळातील प्रेमाच्या आठवणी मनात दाटून येतात.
मूळतः दुःख आणि विरहाची तीव्र भावना व्यक्त करणारे हे गाणं, एका डान्स व्हिडिओमुळे सोशल मीडियावर नवीन रूपात रुजलं. जवळपास सात दशकं जुन्या या गाण्याने नव्या पिढीलाही आपल्या तालावर नाचण्याची प्रेरणा दिली आहे.




Leave a Reply