
चित्रपटसृष्टीत अनेकदा असे घडते की एखादी व्यक्तिरेखा इतकी लोकप्रिय होते की प्रेक्षक वर्षानुवर्षे त्याच्या सीक्वलची वाट पाहत असतात. बॉलिवूडमधील एक चित्रपट असा आहे ज्याची कथा ही तुरुंगात लिहिली गेली होती. ही कथा लिहिण्यासाठी तुरुंगातील कैद्यांनी मदत केली होती. आता हा चित्रपट कोणता आहे असा प्रश्न अनेकांना पडला असेल चला जाणून घेऊया…
'खलनायक' हा चित्रपट त्यापैकीच एक. या चित्रपटातील 'बल्लू बलराम'च्या भूमिकेत संजय दत्तला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते. म्हणूनच आजही या चित्रपटाच्या सीक्वलची चर्चा होत असते. आता खुद्द संजय दत्तने 'खलनायक २' बाबत अपडेट देऊन चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. १९९३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'खलनायक' चित्रपटात संजय दत्तसोबत माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत होते. आता सुमारे ३३ वर्षांनंतर याच्या सीक्वलची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. संजय दत्तने साकारलेला गँगस्टर 'बल्लू' आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुभाष घई यांनी केले होते.
संजय दत्तने सांगितले की, चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यानच त्याला अटक झाली होती. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांवेळी जेव्हा तो तुरुंगात होता, तेव्हा त्याने तिथे असलेल्या कैद्यांना विचारले की, “जर या चित्रपटाचा दुसरा भाग बनला, तर तो कोणाकोणाला पाहायला आवडेल?” यावर सुमारे ४००० कैद्यांनी होकार दिला. त्यानंतर संजय दत्तने त्या सर्वांना 'खलनायक २' ची कथा एकेका पानावर लिहिण्यास सांगितली. अशा प्रकारे त्याच्याकडे चित्रपटाच्या कथेचा ४००० पानांचा एक अनोखा संग्रह तयार झाला.
अभिनेत्याने पुढे सांगितले की, त्याने ती सर्व पाने लक्षपूर्वक वाचली. जेव्हा तो पॅरोलवर बाहेर आला, तेव्हा त्याने सुभाष घई यांची भेट घेऊन ही संकल्पना त्यांच्याशी शेअर केली. ते पाहिल्यावर सुभाष घई म्हणाले, “हा चित्रपट बनवलाच पाहिजे.” अशा प्रकारे 'खलनायक २' ची कल्पना तुरुंगातच तयार झाली, ज्यामध्ये हजारो कैद्यांचे योगदान होते.
'खलनायक' हा त्या काळातील सर्वात गाजलेल्या चित्रपटांपैकी एक मानला जातो. चित्रपटाची कथा, संगीत आणि पात्रांनी प्रेक्षकांवर खोलवर परिणाम केला होता. विशेषतः 'नायक नहीं खलनायक हूं मैं' सारखी गाणी आजही लोकप्रिय आहेत. या चित्रपटाने संजय दत्तच्या करिअरला एक नवी ओळख मिळवून दिली होती.




Leave a Reply