
राज्यातील अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना 1 मेपासून मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केला. या निर्णयानंतर राज्यातील मराठी भाषा सक्तीचा वाद चिघळला आहे. एकीकडे सरकारच्या या निर्णयाला मनसेसह शिवसेना ठाकरे पक्षाने पाठिंबा दिला आहे, तर शिवसेना शिंदे पक्षात या निर्णयावरून फूट पडली आहे. पक्षाचे नेते संजय निरुपम यांनी या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. तर दुसरीकडे कलाविश्वातील अनेक मंडळी यावर आपापली मतं मांडतं आहेत. अनेकांनी प्रताप सरनाईकांना पाठिंबा दर्शविला आहे. परंतु ‘कमळी’ या मालिकेत भूमिका साकारणारी अभिनेत्री सुषमा जयवंतन याबाबत तिचं रोखठोक मत मांडलं आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत सुषमाने आधी मराठी माणसाला सक्ती करा, अशी मागणी केली आहे.
काय म्हणाली अभिनेत्री?
“यूपीवाल्यांना तुम्ही जर मराठी येत नसेल तर गाडी चालवू देणार नाही. मान्य आहे, खूप छान.. पण जेव्हा ते लायसन्स घ्यायला येतात, तेव्हा सरकारकडून त्यांना जे लायसन्स मिळतं, ते दिलंच का जातं? तेव्हा कोणी का नाही सक्त करत? दुसरा प्रश्न, भैय्या जेव्हा भाजी विकत असतो किंवा रिक्षावाला असतो, तेव्हा “तुम यहाँ पे आओगे क्या?”, “ये भाजी कितने में दी?” हे बोलणाऱ्या मराठी माणसाला तुम्ही पहिली सक्ती करा. तुम्ही स्वत: पहिले मराठीत बोला. आपण मराठी बोलायची लाज बाळगतो आणि आपण इतरांना सांगतो की मराठी बोला. काय लॉजिक आहे? मराठी माणसाचा प्रत्येक मुलगा, तुम्ही किती आपल्या मुलांना मराठी माध्यमात शिकवायला पाठवता? नाही करत आहात ना,” असा सवाल तिने मराठी माणसाला केला आहे.
View this post on Instagram
“तर भाषेचं बंधन असणं नसणं मला कळत नाही. पण जे काही चाललंय की ‘तू गलत है, तू गलत है’, तर भाई तू पण चुकीचाच आहेस. याच्याबद्दल विचार करा, याच्यावर मत मांडा, मी नक्कीच चर्चा करेन,” असं ती या व्हिडीओच्या शेवटी म्हणते. सुषमाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘हे बरोबर आहे, आधी आपणच मराठीत बोलत नाही’, असं एकाने म्हटलंय. तर ‘योग्य मुद्दा मांडला आहेस’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे.
Leave a Reply